Wednesday, 13 February 2019

बस स्थानक परिसरातील बेशिस्त रिक्षाचालकांना आवर घाला


नगर । प्रतिनिधी - शहरातील बस स्थानक परिसरातील बेशिस्त रिक्षाचालकांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून या रिक्षाचालकांना पोलिस प्रशासनाने तातडीने आवर घालावा अशी मागणी  राष्ट्रवादी महिला व युवक आघाडीच्या शिष्टमंडळाने पोलिस उपअधिक्षकांना निवेदन देवून केली.
यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे, युवक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, लता गायकवाड, निर्मला जाधव, भारती भोसले, नंदा भोसले, वैशाली गुंड, प्रिती संचेती, अपर्णा पालवे, योगेश गलांडे, आकाश दंडवते, सागर गुंजाळ, नितीन लिगडे, दीपक खेडकर, गोटू व्यवहारे, ऋषी ताठे, विशाल मांडे यांच्या शिष्टमंडळाने गृह विभागाचे पोलिस उप अधीक्षक अरुण जगताप यांची भेट घेवून निवेदन दिले.

निवेदनात म्हंटले आहे की, अहमदनगर शहरामध्ये विशेषतः माळीवाडा बसस्थानक परिसरामध्ये रिक्षा व पॅगो रिक्षा चालकांनी उच्छाद मांडलेला आहे. बस स्थानकांमधून येणार्‍या नागरिकांना आपल्याच रिक्षामध्ये बसवण्यासाठी त्यांच्यामध्ये चढाओढ लागलेली असते. व त्यामुळे रस्त्यातच या रिक्षांचा ठिय्या मांडलेला असतो. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरीक यांना या परिसरातून जाणेही जिकरीचे झाले आहे. त्यातच सर्व सामान्य नागरिकांना या रिक्षाचालकांच्या दंडेलशाहीचा सामना करावा लागतो. व वेळप्रसंगी मारही खावा लागतो.
शहर वाहतूक विभागाचा या सर्व गोष्टींकडे कानाडोळा चालू असून बाकीच्याच गोष्टींकडे लक्ष असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचप्रमाणे जुना स्वस्तिक चौक व सध्याचे राज पॅलेस चौक ते एल.आय.सी. ऑफिस या रोडवर सध्या अनधिकृत गाड्यांनी आपली पार्किंग चालू केलेली आहे. त्यामुळे त्याठिकाणी बरेचशे अवैध धंदे चालू झालेले आहेत. त्यामुळे नागरिकांना तो रस्ता चांगला झालेला असताना सुद्धा त्याचा रस्त्याचा वापर करता येत नाही. अशीच परिस्थिती नगर शहरतील बर्‍याच भागामध्ये पाहायला मिळते. याचाच अर्थ शहर वाहतूक विभागाचा गलथान कारभार पाहायला मिळत आहे. तरी या संपूर्ण गोष्टीचा सारासार विचार करता लवकरात लवकर कारवाई करून नागरिकांच्या समस्या दूर करण्यात याव्यात अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलनाचा पवित्रा हाती घ्यावा लागेल.असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment