Thursday, 28 February 2019

गुलमोहर रस्त्यावर कारची स्कूलबसला धडक


नगर । प्रतिनिधी - सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्यावर आज (गुरुवार) सकाळी एका खासगी शाळेच्या बसला कारने पाठीमागून जोराची धडक दिली. यात कारचालक जखमी झाला असून कारचे नुकसान झाले. सुदैवाने बसमधील विद्यार्थी सुखरुप राहिले. खड्डेमय, अरुंद रस्त्यांमुळे सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी, पाईपलाईन, गुलमोहर रस्त्यावर अपघात होत आहेत.
गुलमोहर पोलिस चौकात आज सकाळी 8 वा. खाजगी शाळेची एक बस थांबली होती. या रस्त्याने जाणार्‍या कारने बसच्या मागील बाजूस धडक दिली. यात कारचालकाच्या डोक्याला मार लागला. बस चालकाने नागरिकांच्या मदतीने या कारचालकाला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले.
 या बसमध्ये विद्यार्थी होते. सुदैवाने त्यांना कसलीही इजा झाली नाही. या परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली असून या रस्त्यांची रुंदी करण्याची व रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

लिका प्राईडमध्ये अत्याधुनिक रसाळ नेत्रालयाचे शानदार समारंभात उद्घाटन


नगर । प्रतिनिधी - ज्या सिंधूताईला तुम्ही जगाची आई म्हणता तिने कधीकाळी नगरमध्येच रेल्वेस्टेशनवर अक्षरश: भीक मागितली आहे. आपल्याकडे नवर्‍याचे काम नेहमीच दिसते. बायकोचे कष्ट दिसत नाहीत. तिला मान देण्याचे काम डॉ.प्रकाश रसाळ यांनी केले हे कौतुकास्पद आहे. आईचे संस्कार व शिकवण अंगीकारत रसाळ परिवारातील प्रत्येक जण उच्चशिक्षित झाला. स्वत:बरोबर कुटुुंबाचा उत्कर्ष साधताना प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. सामाजिक भावनेतून रूग्णसेवेची परंपरा त्यांनी यापुढेही कायम ठेवावी, असे मनोगत ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी व्यक्त केले.
नेत्ररूग्णांना आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देत नगरमध्ये लालटाकी येथील कालिका प्राईड बिल्डिंगमध्ये नवीन सुसज्ज असे रसाळ नेत्रालय सुरू झाले आहे. सोमवारी ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते या नेत्रालयाचे उद्घाटन झाले. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे,  ज्येष्ठ सेनानी साहेबराव थोरवे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. बाळ बोठे, डॉ.सुंदर गोरे, डॉ.रमेश मूर्ती, हेमंतकुमार पोखरणा, डॉ.लक्ष्मीकांत किनगांवकर, डॉ.प्रा.ज्ञानदेव म्हस्के, रसाळ नेत्रालयाचे संचालक डॉ.प्रकाश रसाळ, कार्यकारी संचालिका अमृता रसाळ, मंगल रसाळ, प्रा.मंगेश रसाळ, डॉ.योगेश रसाळ, रोहिणी रसाळ, मनीषा रसाळ आदी उपस्थित होते. 
यावेळी रसाळ परिवारातर्फे सिंधुताई सपकाळ यांच्या कार्यासाठी मदतीचा हात देण्यात आला. शुभारंभानिमित्त खा.दिलीप गांधी, देवीदास धस (आबा), अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या छायाताई फिरोदिया, डॉ.अभिजीत पाठक, डॉ.अशोक देशपांडे आदींनी रसाळ नेत्रालयास भेट देत शुभेच्छा दिल्या.
डॉ.प्रकाश रसाळ यांनी प्रास्ताविकात सांगितले की, शिक्षण घेतानाच ठरवले होते की या क्षेत्रात भव्यदिव्य योगदान द्यायचे. जे द्यायचे ते इतरांच्या चांगल्यासाठी द्यायचे. सर्वांगसुंदर नेत्रालयाचे स्वप्न आज साकार होत आहे. नेत्रालयात मोतिबिंदू उपचारांसाठी स्वतंत्र विभाग असून याठिकाणी विनापट्टी, विनाभूल अत्याधुनिक (फेको) तंत्रज्ञानाने मोतीबिंदू शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय मल्टीफोकल, टोरिक, फोल्डेबल लेन्सेस उपलब्ध आहेत. ए स्कॅन तपासणीची विशेष सुविधा, कॉर्निया विभागात तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया, काचबिंदू विभागात तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया, ऑक्युलोप्लास्टी विभागात उपचार, मार्गदर्शन व शस्त्रक्रिया, रेटिना तपासणी व मार्गदर्शन, मधुमेह नेत्रतपासणी व उपचार, डोळ्यांच्या अपघातासंबंधी परिणामकारक उपचार, कॉन्टॅक्ट लेन्सेस, कॉम्प्युटराईज्ड नेत्रतपासणी, लहान मुलांच्या डोळ्यावरील उपचार आदी सुविधा आहेत.
महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, नगर शहरात जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत आहेत. यातील रसाळ नेत्रालय हे नेत्ररुग्णांसाठी अग्रेसर राहील, असा विश्वास वाटतो.
डॉ. बोठे म्हणाले की, रूग्णांच्या सोयींचा बारीकसारीक विचार करून डॉ. रसाळ यांनी रुग्णालयाची उत्तम रचना केली आहे. सर्जरी व उपचारांमध्ये त्यांचा हातखंडा आहे. उपचारांबरोबरच आपुलकीचा संवाद साधून ते रूग्णांना आपलेसे करतात. कडा येथेही त्यांचे सुसज्ज नेत्रालय आहे. 
अमृता रसाळ यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निर्मलनगरमध्ये बंद पाईप ड्रेनेज कामाचा प्रारंभ


नगर । प्रतिनिधी - दैनंदिन जीवनात वीज, रस्ते, पाणी या सुखसुविधा मिळाल्या की बहुतेक प्रश्न आपोआप मार्गी लागतात. नगरची महानगरपालिका होऊनही शहरालगतच्या भागात आजही रस्ते, पाणी, ड्रेनेज प्रश्न सुटलेले नाहीत. प्रभाग क्र.2 मध्ये मात्र निर्मलनगर, लक्ष्मीनगर, सुर्यनगर भागात गेल्या 10 वर्षात निखिल वारे, बाळासाहेब पवार, विनित पाऊलबुधे यांनी नागरिकांचे प्रश्न सोडविले. त्यामुळे या त्रिमूर्तींना पुन्हा-पुन्हा नगरसेवक होण्याची संधी मिळाली, असे प्रतिपादन सेवानिवृत्त विक्रीकर अधिकारी एम.बी.साळवे यांनी केले.
निर्मलनगर येथील गाडेकर चौक ते परिसरातील भागात बंद गटार पाईप ड्रेनेज कामाचा शुभारंभ श्री.साळवे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक विनित पाऊलबुधे, रुपाली वारे, संध्या पवार सुनील त्र्यंबके, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, ह.भ.प.विश्वनाथ पोकळे, अजय हिवाळे, नितीन काळे, योगेश पिंपळे,  सचिन अकोलकर आदी उपस्थित होते.
निखिल वारे म्हणाले, नागरीकांच्या सेवेत आम्ही चारही नगरसेवक आहोत. तुमच्या प्रश्नांसाठी आम्ही एकत्रीत लढा देऊ. 
तुमच्या पाठबळामुळेच तिसर्‍या वेळेसही नगरसेवकपद वारे यांच्या घरातच आहे. मनपात आमची सत्ता नसली तरी जनतेच्या कामासाठी आम्ही कामे करुन घेतो. यावेळी विनित पाऊलबुधे, बाळसाहेब पवार, सुीनल त्र्यंबके यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी भाऊसाहेब कासार, मच्छिंद्र तागड, नारायण काते, रमेश ठोंबरे, लहानू तागड, विलास खरात, कैलास तोडकर, वैभव पोकळे, बाळासाहेब हिवाळे,  शोभा वाघमारे, शांता काळे, आश्विनी सोनमाळी, सविता गटणे, लक्ष्मी गारडे, हेमलता सरोदे, नंदा लडकत, सौ.साळवे उषा, सुलोचना पंतम, मानसी सोनमाळी आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

साई-एशियन हॉस्पिटलच्या वर्धापन दिनी कॅथलॅबचा शुभारंभ


नगर । प्रतिनिधी -  डॉक्टरांना जीव वाचवणारा परमेश्वराचा दूत मानले जाते.रुग्ण, नातेवाईक यांच्यातील सुसंवादामुळे अप्रिय घटना टाळता येतात. नगरमधील साई एशियन हॉस्पिटलने आरोग्य सेवा देतांना गोरगरीब रुग्णांना, सर्वसामान्यांना ज्या शासकीय आरोग्यदायी योजना आहेत, त्यांचा लाभ करुन द्यावा, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
तारकपूर येथील जे.एस.एन.अहमदनगर आरोग्य प्रायव्हेट लिमिटेड साई एशियन हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त कॅथलॅबचा शुभारंभ महापौर वाकळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे, बीड जिल्हा काँग्रेसच्या महिलाध्यक्षा मीनाक्षी पांडुळे, गोरेगांवचे माजी सरपंच नाना नरसाळे आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते.
महापौर वाकळे पुढे म्हणाले, पुणे-मुंबई तसेच मोठ्या महानगराप्रमाणेच आता नगर शहरातील तारकपूर परिसर हे अद्यावत रुग्णालयांमुळे ओळखले जाऊ लागले.  साई एशियनच्या सर्व डॉक्टरांनी सेवाभाव मनात ठेवून रुग्णसेवा द्यावी. जागतिक दर्जाच्या सुविधा येथे मिळणार असल्याने रुग्णांना फायदा होईल. 
प्रास्तविकात हॉस्पिटलचे संचालक डॉ.नितिन नागरगोजे यांनी हॉस्पिटलमध्ये किडनीच्या शस्त्रक्रिया, पॅरेलिसीस व मेंदूच्या उपचारांचे अत्याधुनिक केंद्र, सर्पदंश, विषबाधा वेगळा कक्ष, एचआयव्ही व कॅन्सरवर उपचार येथे केले जात असल्याचे सांगितले. डॉ. जगदीश चहाळ यांनी सांगितले की, या हॉस्पिटलमध्ये गुडघेरोपण शस्त्रक्रिया, मणक्याची लेझर शस्त्रक्रिया, दुर्बिणीच्या सहाय्याने सांध्यांच्या शस्त्रक्रिया अल्पदरात येथे केल्या जात असल्याने रुग्णांचा प्रतिसाद मिळतो. 
डॉ.महेश जरे यांनी कॅथलॅब बद्दल सविस्तर माहिती देऊन हॉस्पिटलमधील रेडिओलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, न्यूरोसर्जरी, युरोसर्जरी, बर्न व प्लॉस्टिक सर्जरी याबाबत माहिती दिली.  डॉ. सचिन पांडूळे यांनी हे हॉस्पिटल 100 बेडचे असून, एमआयआर, सीटीस्कॅन, डायलिसीस व विविध विभागातील अत्याधुनिक मशिनरी विषयी सांगितले.
याप्रसंगी मीनाक्षी पांडूळे, नाना नरसाळे आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पोपट धामणे यांनी केले. आभार जनसंपर्क अधिकारी संपत पंडित यांनी  मानले. कार्यक्रमास नगर शहरातील डॉक्टर, मेडिकल, एमआर, लॅब, आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

दासनवमीनिमित्त समर्थ प्रशालेची प्रभातफेरी


नगर । प्रतिनिधी - दासनवमी उत्सवानिमित्त श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ आयोजित श्री समर्थ विद्या मंदिर, सावेडी प्रशालेत पालखीसह प्रभात फेरी काढण्यात आली.
मुलींच्या लेझीम पथकाने रंगतदार लेझीमचे डाव खेळून मने जिंकून घेतली. समर्थांच्या पालखीचे पूजन चौकाचौकांतून करण्यात आले. मनाचे श्लोक, जय जय रघुवीर समर्थ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. प्रशालेत पालखीचे पूजन होऊन सर्व विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
प्रभात फेरीमध्ये संस्थेचे व्हा. चेअरमन डी. आर. कुलकर्णी, खजिनदार सतीशचंद्र कुलकर्णी,  शालेय समितीचे चेअरमन सुरेश क्षीरसागर, माजी प्राचार्या संध्या कुलकर्णी, माध्यमिकच्या प्राचार्या संगीता जोशी, प्राथमिकचे मुख्याध्यापक दुर्योधन कासार आदींसह विद्यार्थी, पालक सहभागी झाले होते.

..तर ग्रामसेवकांचे 10 मार्चपासून असहकार आंदोलन


नगर । प्रतिनिधी - नगर जिल्ह्यातील ग्रामसेवक शासकीय योजनांची गावपातळीवर अतिशय प्रभावी अंमलबजावणी करीत आहेत. ग्रामसेवकांच्या प्रयत्नातूनच जिल्हा अनेक योजनांच्या अंमलबजावणीत अग्रेसर झालेला आहे. असे असताना प्रशासनाकडून ग्रामसेवकांवर चुकीच्या पध्दतीने निलंबनाच्या कारवाया होत आहेत. असे प्रकार अनेक ग्रामसेवकांच्या बाबतीत होत असून सर्व संबंधित ग्रामसेवकांचे निलंबन तातडीने रद्द करून त्यांना पुनर्स्थापित करावे, अन्यथा दि.10 मार्चपासून जिल्हाभर असहकार आंदोलन हाती घेण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी दिला आहे.
ग्रामसेवकांवर होणार्‍या अन्यायकारक कारवाईच्या निषेधार्थ जिल्ह्यातील ग्रामसेवकांची एकत्र बैठक घेतली. यानंतर ढाकणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी जिल्हा सरचिटणीस अशोक नरसाळे, कुंडलिक भगत, किशोर जेजूरकर, एकनाथ आंधळे, शहाजी नरसाळे, राजेंद्र मेहेत्रे, सुरेश मंडलिक, दिलीप नागरगोजे, संपत दातीर, सुनिल नागरे, बाळासाहेब आंबरे, रमेश बांगर, सुनील वाघ, भैरया कोतुळे आदी उपस्थित होते.
प्रशासनाने नुकतीच पारनेर तालुक्यातील रूईछत्रपती तसेच नगर तालुक्यातील इमामपूर येथील ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. याशिवाय अन्य अनेक ग्रामसेवकांवरही अशा कारवाया झालेल्या आहेत. अनेक प्रकरणात कोणतीही खातरजमा न करता निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत. ही कारवाई अतिशय चुकीच्या पध्दतीने होत असल्याने ग्रामसेवक संवर्गात नाराजी पसरली आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्वच संबंधित ग्रामसेवकांचे निलंबन रद्द करावे, 90 दिवसांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या ग्रामसेवकांना तात्काळ सेवेत समावून घ्यावे, आश्वासित प्रगती योजनेचे आदेश तात्काळ मिळावेत आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

ससेहोलपट थांबविण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दिव्यांग बांधवांचा ठिय्या


नगर । प्रतिनिधी -  जिल्हा रुग्णालयात दर बुधवारी अपंग दाखल्यांसाठी येणार्‍या दिव्यांग बांधवांची ससेहोलपट थांबून एकाच दिवशी तपासणी करुन त्याच दिवशी दिव्यांगांना दाखले देण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या वतीने जिल्हा रुग्णालयासमोर काल ठिय्या आंदोलन करण्यात आले. 
प्रहार शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष पवार, प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.लक्ष्मण पोकळे, विनोदसिंग परदेशी, अजित धस, बाबासाहेब महापुरे, प्रकाश बेरड, लक्ष्मीबाई देशमुख यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. 
दाखल्यासाठी दिव्यांग बांधवांना हालअपेष्टा सहन करावी लागत असताना अचानकपणे आंदोलन करण्यात आल्याने काही वेळ अपंग दाखल्यांचे कामकाज कोलमडले होते. बुधवारी अपंग दाखल्याच्या कामासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने अपंग बांधव येत असतात. कर्मचार्‍यांची मुजोरी व जिल्हा रुग्णालयाच्या कार्यशैलीमुळे तासन्तास रांगेत उपाशीपोटी दिव्यांगांना उभे रहावे लागते. दिव्यांगांचे हाल पाहून देखील कुठलेही सोयरसुतक नसलेल्या जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला. शिष्टमंडळाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पी.एम. मुरंबीकर यांची भेट घेऊन या प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा केली. डॉ.मुरंबीकर यांनी तपासणी करुन तातडीने अपंग दाखले देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. 
जिल्हा रुग्णालयात अपंगांची तपासणी होऊन त्यांना दाखले देण्याचे कामकाज दिवसभर चालू होते. तर 12 वा. बंद होणारी केस पेपरची खिडकी दुपारी 2 वाजेपर्यंत चालू होती.   
अपंग दाखला मिळण्यासाठी जिल्हा रुग्णालयात मार्गदर्शक फलक लावण्यात यावे, जुने प्रमाणपत्र अवैध केल्यानंतर नवीन प्रमाणपत्र त्याच दिवशी द्यावे, तासनतास रांगेत थांबणार्‍या दिव्यांग बांधवांना टोकन देऊन कामकाज करावे, वेटिंग रुमची सेवा उपलब्ध करावी, अपंग दाखल्यासाठी येणार्‍या दिव्यांग बांधवांना सन्मानाची वागणूक द्यावी, व्हिल चेअरची सुविधा उपलब्ध करावी, बुधवारी अपंग दाखल्यासाठी सर्व डॉक्टर व कर्मचार्‍यांनी पूर्णवेळ थांबावे, आठवड्यातून दोन दिवस अपंग दाखल्यांचे कामकाज चालवावे, कर्णबधीर, मूकबधीर, डोळे तपासणी जिल्हा रुग्णायलातच करावी, वरील मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टची व्यवस्था करावी अन्यथा सर्व सुविधा खालच्या मजल्यावरच उपलब्ध करावी आदी मागण्या करण्यात आल्या.

मनपा सभापती निवडणूक 4 मार्चला


नगर । प्रतिनिधी - महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती व महिला बालकल्याण समितीच्या सभापती, उपसभापतीची निवडणूक येत्या 4 मार्चला होणार आहे. विभागीय आयुक्तांनी मनपाच्या प्रस्तावानुसार बुधवारी रात्री ही तारीख जाहीर केली आहे. 
पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता प्रथम स्थायी समिती सभापती व त्यानंतर महिला बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती नगरसचिव एस.व्ही.तडवी यांनी दिली आहे. आज गुरूवारी दुपारनंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम पीठासीन अधिकार्‍यांकडून जाहीर होणार आहे.

नामवंत बँकेच्या गोल्ड लोन लिलावात बनावट सोने आढळल्याने लिलाव स्थगित


नगर । प्रतिनिधी - शहरातील एका नामांकित बँकेत गोल्ड लोन लिलावावेळी बनावट सोने आढळून आल्याने लिलाव स्थगित करण्यात आल्याचा प्रकार घडल्याची शहरात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे ही बँक पुन्हा वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची शक्यता आहे. दरम्यान, बँकेच्या लक्षात आल्यावर लगेच त्यानी पंचनामा करुन पुढील कारवाई करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. 
नगर शहरातील एका नामवंत बँकेत बुधवारी (दि. 27) गोल्ड लोनसाठी ठेवण्यात आलेल्या सोन्याचा लिलाव निश्चित करण्यात आला होता. त्यासाठी 26 बॅग होत्या. त्या बॅगमध्ये किती सोेने होते याची मात्र माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. बँकेने लिलावासाठी सर्व 26 बॅग बाहेर काढल्या. त्यावेळी पहिल्या तीन बॅगमध्ये बनावट सोने आढळून आले. त्यामुळे सर्वच अस्वस्थ झाले. या तिन्ही बॅगेचा कुठल्याही प्रकारे लिलाव करण्यात आला नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बँकेने लगेचच पंचनामा करुन घेतला. त्यासाठी कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. दरम्यान, संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात हालचाली सुरु झाल्या असल्या तरी त्यावर बँकेकडून केव्हा निर्णय घेण्यात येतो याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

Wednesday, 27 February 2019

सिद्धीबागेच्या साफसफाईसह मत्स्यालयाची तातडीने दुरुस्ती करावी ः महापौर


नगर । प्रतिनिधी - नगर शहरातील नागरिकांसाठी सोयीचे असलेले एकमेव उद्यान असलेल्या सिद्धीबागेच्या झालेल्या दुरवस्थेची महापौर बाबासाहेब वाकळे यांनी गांभीर्याने दखल घेत मंगळवारी (दि.26) दुपारी बागेची पाहणी करीत तातडीने साफसफाई व आवश्यक दुरुस्तीचे काम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. 
शहरातील सिद्धीबागेची सध्या अतिशय दुर्दशा झाली आहे. नगर शहरातील लहान मुलांच्या खेळण्यासाठी एकमेव असणारी सिद्धीबाग ही आता उध्वस्त होण्याच्या मार्गावर येवून ठेपली आहे. या पूर्वी या बागेत दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी असायची, शहरातील नागरिक आपल्या लहान मुलांना दररोज सायंकाळी खेळण्यासाठी घेऊन येत होते. आजची परस्थिती या बागेत असणारी विविध प्रकारची खेळण्या या लहान मुलांच्या खेळण्यास योग्य नाही. 
तसेच जो आकर्षक आणि भव्य मासा आहे तोही बंद पडलेला असल्याने या बागेत मुलांसाठी खेळण्याचे वातावरणच उरलेले नाही.एकेकाळी सकाळी व सायंकाळी बच्चेकंपनी व नागरिकांच्या गर्दीने फुलणार्‍या सिद्धीबागेची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहे. त्याची दखल घेत महापौर बाबासाहेब वाकळे यांनी मंगळवारी (दि.26) दुपारी बागेची पाहणी  केली. यावेळी उपमहापौर मालन ढोणे, उपायुक्त प्रदीप पठारे, सुवेंद्र गांधी, नगर सचिव एस.बी.तडवी, धनंजय जाधव, अजय चितळे, सागर गोरे, उद्यान विभागाचे किसन गोयल, उद्धव म्हसे आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर वाकळे यांनी सर्व परिसराची पाहणी केली. तसेच दुरवस्था झालेले मस्त्यालय तातडीने दुरुस्त करून घ्यावे, उद्यान विभागाचे जास्त कर्मचारी बुधवारी (दि.27) सिद्धीबागेत बोलावून घेत त्यांच्याकडून संपूर्ण बागेची साफसफाई करून घ्यावी. तसेच या पुढे सातत्याने दैनंदिन स्वच्छता करण्यात यावी. बागेतील खेळण्या, विद्युत दिवे यांच्या दुरुस्ती साठीचे प्रस्ताव तातडीने तयार करून ते मंजुरीसाठी सादर करावेत असे आदेश दिले.

वा मोटरसायकलच्या महाराष्ट्रातील नहार ऑटोमेटीक्स या शोरूमचा नगरमध्ये शानदार शुभारंभ


नगर । प्रतिनिधी - क्लासिक लिजंड प्रायव्हेट लि.च्या जावा मोटरसायकलच्या नहार ऑटोमेटीक्स या नगरमधील शोरूमचा शुभारंभ कंपनीचे चीफ एक्झीक्यूटिव्ह ऑफिसर आशिषसिंग जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. 
यावेळी खासदार दिलीप गांधी, डीलर मनोज नहार, मनीष नहार, साहिल नहार, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, विक्रम फिरोदिया, कंपनीचे अधिकारी व  मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जोशी म्हणाले की, नगरमधील युवकांची नव्या व स्टायलिश मोटार सायकलची क्रेझ  व गरज पाहून नगरचे डीलर नहार परिवाराच्या समवेत सुरु करण्यात आलेले हे महाराष्ट्रातील नववे शोरूम आहे. भारतात आजपर्यंत शंभर शोरूम सुरु करण्यात आली असून सगळ्याच ठिकाणी उत्तम प्रतिसाद लाभला आहे. येत्या काळात नवनवीन स्कीम व फायनान्सच्या योजनाद्वारे जावा दुचाकी उपलब्ध होतील.
द जावा व जावा फोर्टी टू या दोन मॉडेलचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आकर्षक रंग, स्मूथ बटन स्टार्ट, 299 सीसी लिक्विड कुल इंजिन, आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या या दुचाकींचा अनुभव अविस्मरणीय असा निश्चित असल्याची माहिती जोशी यांनी  दिली.
खासदार गांधी यांनी या प्रसंगी नहार परिवाराला शुभेच्छा दिल्या. काळाची गरज ओळखून व सर्वोत्तम सेवा दिली तर  व्यवसाय यशस्वी होतो. जावा शोरूमच्या माध्यमातून सर्वोत्तम सेवा मिळेलच यात शंका नाही, असे सांगितले.
नहार परीवाराच्या  वतीने मनोज नहार यांनी सर्वांचे स्वागत व सत्कार केला. नगरमधील मोहनलाल मानधना, श्रीमती छायाताई फिरोदिया, श्रीमती आशाताई फिरोदिया, गौरव फिरोदिया, महेंद्र कुलकर्णी, संदीप ऋषी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

साध्वी प्रितीसुधाजी महाराजांची इच्छा पूर्ण करु ः महापौर


नगर । प्रतिनिधी - गुरु महाराजांचा संकल्प प्रेरणादायी आहे. एक अतिशय चांगला असा गो-शाळेचा विचार त्यांनी मांडलाय आणि सध्याच्या वातावरणात शेतकर्‍यांच्या पशुधनाचं संगोपन, संभाळ करण्यासारखे पुण्याचे दुसरे काम नाही. उज्वल गोरक्षण संस्थेच्या या नियोजित गो-शाळेसाठी मनपाचा शहरालगतचा मोकळा भूखंड देण्यासाठी योग्य ती कार्यवाही आणि संपूर्ण सहकार्य करु, असे आश्वासन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी जैन समाजाच्या शिष्टमंडळाला दिले.  वाकोडी येथील कत्तलखान्याच्या प्रश्नाबाबतही जैन समाजाचा असलेला विरोध आणि गुरु महाराजांच्या भावनांचा विचार करुन आपण योग्य तोच निर्णय घेऊ अर्थात हा कत्तलखाना होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा यांच्या नेतृत्वाखाली जैन समाजातील कार्यकर्त्यांनी महापौर श्री.वाकळे आणि उपमहापौर मालनताई ढोणे यांची भेट घेऊन गो-शाळेसाठी भुखंडासह सहकार्याची विनंती केली. 
सुभाष मुथा म्हणाले, अहिंसा-जीवदया हा जैन समाजाचा आत्मा आहे. जैन धर्मात जीवदयेला सर्वोच्च प्राधान्य असून, वाढती हिंसा सध्याच्या शेतकर्‍यांची बिकट परिस्थितीत त्यांच पशुधन कत्तलखान्याकडे जातय.  किरणप्रभाजी महाराजांनीही नगरला गो-शाळा प्रकल्पाची गरज बोलून दाखवली होती, असे श्री.  मुथा यांनी सांगितले.
 शिष्टमंडळात जैन मंदिराचे विश्वस्त राजू शहा, किशोर भंडारी, दिनेश गांधी, व्यापारी कार्यकर्ते फुलचंद गांधी, शैलेश गांधी, शेखर गांधी, संतोष गांधी, राजेंद्र गांधी, सचिन चोपडा, विनोद कटारिया, अशोक बलदोटा, शांतीलाल गुगळे आणि अजय बोरा आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये दि.4 ते 31 मार्चदरम्यान मोफत तपासणी शिबिर


नगर । प्रतिनिधी - राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या 27 व्या पुण्यस्मृतीदिनानिमित्त जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटल ऍण्ड हार्ट सर्जरी सेंटर येथे दि.4 मार्च ते दि. 31 मार्च या कालावधीत विविध मोफत आरोेग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत रूग्ण तपासणी करण्यात येणार आहे. दरवर्षी राबविण्यात येणार्‍या या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ असंख्य रूग्णांना झाला आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलला एन.ए.बी.एच. मान्यता मिळालेली असून ही मान्यता असलेले नगर जिल्ह्यातील 200 बेडस्चे हे पहिलेच हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलमधील उच्च दर्जाच्या आरोग्य सेवांचा लाभ या मोफत शिबिरांतून सर्वसामान्य रूग्णांना होणार आहे. तसेच या शिबिरादरम्यान एमआरआय तपासणी 2 हजार रुपये, सीटी अँजिओग्राफी 1500 रुपये, सिटी स्कॅन 1000 रुपये, सोनोग्राफी 350 रुपये, डिजीटल एक्स रे तपासणी 200 रुपयात केली जाणार आहे.
शिबिराला सोमवार दि.4 मार्च रोजी सुरूवात होणार आहे. पहिल्या दिवशी अस्थिरोग तपासणी, मणके व सांधेबदली शस्त्रक्रिया शिबिर होणार आहे. यात इंपोर्टेड इम्प्लांटसह संपूर्ण गुडघा प्रत्यारोपण 85 हजार रुपयात, संपूर्ण खुबा प्रत्यारोपण इंपोर्टेड इम्प्लांटसह 55 हजार रुपयांत करण्यात येणार आहे. यासह ए.सी.एल., रि-कन्स्ट्रक्शन व ऑर्थोस्कोपी निदान केले जाणार आहे. महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थींच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील. याशिवाय याच दिवशी पू.आनंद, पू.अचल गुरू फौंडेशन, पुणे यांच्या सहकार्याने लहान मुलांचे अस्थिव्यंग तपासणी व शस्त्रक्रिया मार्गदर्शन शिबिर होणार आहे. यात मुलांवरील शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील. 
दि.7 मार्च रोजी हर्निया, हायड्रोसील व इतर जनरल शस्त्रक्रिया शिबिर होणार आहे. यात सवलतीच्या दरात जनरल शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अ‍ॅपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसील शस्त्रक्रिया प्रत्येकी 4 हजार रुपयांत केल्या जातील. 
दि.9 मार्च रोजी पोटाचे आजार, सर्व प्रकारचे यकृताचे (लिव्हर) व स्वादुपिंडाचे (पॅनक्रिया) आजार, कॅन्सर निदान व उपचार, सर्व प्रकारच्या स्कोपी, गॅस्ट्रोस्कोपी 1800 रुपये, स्कोपी 2200 रुपयात केल्या जातील. शिबिराची वेळ दुपारी 12 ते 3 अशी राहील. 
दि.12 मार्च रोजी बालरोग तपासणी शिबिर होणार आहे. दि.13 मार्च रोजी कॅन्सर तपासणी शिबिर होणार आहे. यात घसा, फुफ्फुस, आतडे, तोंडाचा इत्यादी कॅन्सर तपासणी करण्यात येणार आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे केमोथेरपी उपचार मोफत उपलब्ध आहेत. याशिवाय सर्व प्रकारचे रेडिओथेरपी उपचार नाशिक येथील नामको कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मोफत केले जातील. महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत रूग्णांना याचा लाभ मिळेल. 
दि.14 मार्च रोजी मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी आणि चिकित्सा शिबिर होणार आहे.
दि.15 मार्च रोजी मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महावीर भवन येथील आनंदऋषीजी नेत्रालय येथे हे शिबिर होईल.
दि.16 मार्च रोजी किडनी आजार तपासणी शिबिर होणार आहे. यात अंगावर सूज येणे, लघवी कमी अथवा लाल होणे, किडनी जंतू संसर्ग, डायलेसिस रूग्णांची तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे. महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत डायलेसिस मोफत केले जाईल.
दि.18 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत सलग महिनाभर दुर्बिणीव्दारे शस्त्रक्रिया (बिनटाका) शिबिर होणार आहे. यात लॅप्रोस्कोपीव्दारे पोटातील, बेंबी, हर्नियाची शस्त्रक्रिया 10 हजार रुपये, पित्ताशय काढणे शस्त्रक्रिया 10 हजार रुपये, स्त्रियांच्या गर्भाशयाची पिशवी काढणे 10 हजार रुपये, ऍपेंडिक्स शस्त्रक्रिया 6 हजार रुपये, मूळव्याधीवर इंजेक्शन व्दारे उपचार 2 हजार रुपये, स्त्रीयांचे वंध्यत्व तपासणीसाठी ट्युबल पेटेन्सी टेस्ट 2 हजार रुपये, लॅप्रोस्कोपी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया 2 हजार रुपये, गॅस्ट्रोस्कोपी 500 रुपयात करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रियांसाठी औषधे, जाळीचा व इतर खर्च वेगळा असेल. 
दि.19 मार्च रोजी स्त्रीरोग, गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबीर होणार आहे. यात दुर्बिणीव्दारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात केल्या जातील. गर्भवती मातांची सोनोग्राफी, रक्त, लघवी इत्यादी तपासण्या शिबिरापासून पुढील महिनाभराच्या कालावधीत 50 टक्के सवलतीच्या दरात केल्या जातील. शिबिरातील गर्भवती मातांना बाळंतपण, सिझेरियनच्या फीमध्ये 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे.
दि.21 मार्च रोजी प्लास्टिक सर्जरी शिबिर होणार आहे. यात लहान मुलांच्या जन्मजात हातांच्या समस्या, व्यंग, मधुमेहाच्या जुनाट जखमा, पायाचा जखमा, दुभंगलेले ओठ, तुटलेले कान, चेहर्यावरील व्रण आदींवर प्लास्टिक सर्जरी केली जोईल. 
दि.22 मार्च रोजी कान, नाक, घसा तपासणी शिबिर होणार आहे. महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ऑडिओमॅट्री तपासणी मोफत केली जाणार आहे. आवश्यक रूग्णांना मोफत श्रवणयंत्र दिले जाणार आहे. यासाठी रूग्णांनी आवश्यक कागदत्रांसह उपस्थित रहावे. ही योजना शिबिराव्यतिरिक्तही आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे.
दि.23 मार्च रोजी प्रोस्टेट ग्रंथी, मुतखडा, लघवीचे विकार तपासणी व उपचार शिबिर होणार आहे. दि.27 मार्च रोजी होमिओपॅथी शिबिर, थायरोईड व इतर हार्मोन्स विकार, त्वचा विकार शिबिर होणार आहे. दि.29 मार्च रोजी त्वचा रोग तपासणी शिबीर होणार आहे.
दि.30 मार्च रोजी दंतरोग तपासणी व उपचार शिबिर होणार आहे. यात दातांच्या नसावरील उपचार मेटल कॅपसह 2 हजार 800 रुपये, दातांच्या नसावर सिरॅमिक कॅपसह उपचार 3200 रुपये, रूट कॅनल 1600 रुपये, दातांची कवळी बसवणे 7 ते 14 हजार दरम्यान, दात साफ करणे, दातामध्ये सिमेंट भरणे 400 रुपये, दात काढणे आदी उपचार केले जाणार आहेत. दि.31 मार्च रोजी हृदयरोग शिबिराने या शिबिरांची सांगता होणार आहे.

गेल्या 5 टर्ममध्ये भाजप सरकारकडून विकास कामांना सर्वाधिक निधी मिळाला


नगर । प्रतिनिधी - विधानसभेत आमदार म्हणून काम करण्याची आपली ही पाचवी टर्म आहे. एक अपवाद वगळता 4 टर्म  सत्ताधारी पक्षाचा आमदार राहण्याचा योग आला. मात्र या पाच टर्ममध्ये विविध विकास कामांसाठी सर्वाधिक निधी सध्याच्या भाजप सरकारने दिला असल्याचे प्रतिपादन आ.शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
नगर तालुक्यातील दरेवाडी येथे जलयुक्त शिवार अभियान, आमदार निधी, 25-15 योजना, दलित वस्ती सुधार योजना, 14 वा वित्त आयोग अशा विविध योजनांमधून सुमारे 3 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन आ.कर्डिले यांच्या हस्ते व भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांच्या अध्यक्षतेखाली झाले त्यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर  नगर बाजार समितीचे सभापती विलासराव शिंदे, रेवणनाथ चोभे, संचालक संदीप कर्डिले, हरिभाऊ कर्डिले, बाबासाहेब खर्से, बन्सी कराळे, संतोष म्हस्के, बाळासाहेब निमसे, अभिलाष घीगे, दिलीप भालसिंग, कानिफनाथ कासार, खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन संभाजी पवार, संचालक छत्रपती बोरुडे, श्याम घोलप, दीपक कार्ले, अरणगावचे सरपंच मोहन गहिले, रभाजी सूळ, संजय धोत्रे, जयराम बेरड, माजी जि.प.सदस्या पूनम भिंगारदिवे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
आ.कर्डिले पुढे म्हणाले राज्यात व देशात भाजपची सत्ता असल्याने भरीव निधी मतदारसंघासाठी आणता येत असून, या सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून शेतकर्‍यांसह सर्व घटकांना दिलासा देण्याचे काम केले आहे. खर्‍या अर्थाने हे सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे सिद्ध झाले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून नगर तालुक्याला आतापर्यंत सुमारे 90 कोटींचा निधी मिळाला आहे. लवकरच नगर, राहुरी व पाथर्डी तालुक्यासाठी सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांच्याकडून बुद्धविहारांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मिळणार असून मागणी करणार्‍या गावांसाठी प्रत्येकी 25 लाखांचा निधी दिला जाणार आहे.
प्रा. भानुदास बेरड म्हणाले, भाजप सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. आजपर्यंत कोणत्याही सरकारला अशी कामगिरी करता आलेली नाही. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच अनिल करांडे यांनी केले. यावेळी सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत राहुल थोरात यास सुवर्णपदक


नगर । प्रतिनिधी - बंगलोर (कर्नाटक) येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत अ.ए.सो.चे भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचा विद्यार्थी राहुल सुनील थोरात (इ.9 वी) याला सुवर्णपदक मिळाले आहे.
त्याच्या या यशाबद्दल अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी परसंस्थेचे चेअरमन शेखर देशपांडे व व्हा.चेअरमन बाळासाहेब गंगेकर यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.यावेळी संचालक दिलीप कोतकर, बाबासाहेब मुदगल, प्रकाश अजबे,बाळासाहेब पवार, विकास गिते, अजय कांबळे, किशोर कानडे, सतिश ताठे, संस्थेचे जेष्ठ माजी संचालक वसंत थोरात आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शेखर देशपांडे म्हणाले, खो खो हा आपला महाराष्ट्राचा खेळ आहे. या खेळात नगर जिल्ह्याने या पूर्वीही भरीव अशी कामगिरी केलेली आहे. खो खो खेळातील प्राविण्यामुळे शिवछत्रपती पुरस्कार मिळवणारे खेळाडू नगर शहरातील आहेत. 
राहुल थोरात याने राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून नगर शहराचा लौकिक पुन्हा एकदा वाढविला असल्याचे ते म्हणाले.

शहरातील पथदिव्यांच्या दुरुस्तीला येणार वेग


नगर । प्रतिनिधी - महापालिकेच्या विद्युत विभागासाठी इलेक्ट्रीक सीडी असलेली 2 हायड्रोलिक वाहने दाखल झाली असून त्यामुळे विद्युत विभागामार्फत करण्यात येणार्‍या विविध कामांबरोबरच नगर शहरातील व उपनगरातील नादुरुस्त होवून बंद पडलेल्या पथदिव्यांच्या दुरुस्तीच्या कामाला आता वेग येणार असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली. 
महापालिकेने विद्युत विभागासाठी 2 अत्याधुनिक हायड्रोलिक वाहने खरेदी केले असून त्याचे पूजन महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते मंगळवारी (दि.26) दुपारी करण्यात आले. यावेळी उपमहापौर मालन ढोणे, उपायुक्त प्रदीप पठारे, यंत्र अभियंता परिमल निकम, नगरसेविका लता शेळके, अजय चितळे, विलास ताठे, मुख्य लेखा परीक्षक चंद्रकांत खरात, कॅफो प्रवीण मानकर, अमोल लगड, संजय ढोणे आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर वाकळे यांनी माहिती देताना सांगितले की, प्रत्येकी सुमारे 18 लाख रुपये किमतीची ही दोन्ही वाहने असून ती गुजरातमधील अहमदाबाद येथील कंपनीकडून बनवून घेतलेली आहे. या वाहनावरील  इलेक्ट्रीक सीडी या 13 मीटर (40 फूट) उंचीपर्यंत जाऊ शकतात, तसेच सुमारे साडेचार मीटर वर्तुळाकार काम करू शकतात. या सीडीच्या ट्रॉली मध्ये 2 कर्मचारी उभे राहून काम करू शकतात. अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञान व सर्व सोयी सुविधायुक्त ही वाहने आहेत. 
त्यामुळे आता विद्युत विभागातील विविध कामे, पथदिव्यांची दुरुस्ती, झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम वेगात होणार असल्याचे महापौर वाकळे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचा शहर जिल्हाध्यक्ष लोकसभेनंतर ठरणार


नगर । प्रतिनिधी - महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपला राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांनी लपविल्याने त्यांना पदावरून पायउतार केलेले आहे. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच विधाते यांना नोटीस काढलेली होती. त्यामुळे शहर जिल्हाध्यक्षपद रिक्त असून त्यासाठी अनेकांनी बाशिंग बांधले आहे. मात्र, आज जर एखाद्या व्यक्तीला या पदावर बसविले तर नाराजी वाढू शकते त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो. त्यामुळे लोकसभेनंतरच या पदाची निवड होणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्राकडून मिळाली आहे. आता राष्ट्रवादीचा शहर जिल्हाध्यक्ष लोकसभेच्या निवडणुकीनंतरच ठरणार आहे. 
आमदार अरूण जगताप व संग्राम जगताप यांचे अत्यंत विश्वासू म्हणून माणिक विधाते यांना शहर जिल्हाध्यक्षपद दिले होते. आ.जगताप यांनीच त्यांना या पदावर बसविले होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात पक्षसंघटनेचे उत्तम काम केले. मनपा निवडणुकीतही त्यांची कामगिरी चांगली राहिली. परंतु महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर मनपात भाजपने सत्ता मिळविली. परंतु राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजपाला पाठिंबा देण्याचा नकार दिलेला असतानाही हा पाठिंबा कसा दिला? असा सवाल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शहरातील स्थानिक नेतृत्व व शहरजिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांना विचारला. पक्षसंघटना या नात्याने शहरजिल्हाध्यक्ष विधाते यांनी वरिष्ठांना कोणतीही माहिती दिली नाही. असा ठपका विधातेंवर ठेवण्यात आला. माहिती लपविली व पक्षाच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. निवडणुकीनंतर पंधरा दिवसातच हा निर्णय घेण्यात आला. दीड महिन्यापासून हे पद रिक्त आहे. लोकसभेच्या तोंडावर तातडीने या पदावर नव्या व्यक्तीची वर्णी लागावी यासाठी शहरातील अनेकांनी वरिष्ठांकडे फेल्डिंग लावली. तीन लोकांच्या शिफारशीही वरिष्ठांकडे गेल्या आहेत. इच्छुकांची संख्या वाढली असल्याने लोकसभेच्या तोंडावर निवड केल्यास नाराजी वाढू शकते. त्यामुळे ही निवडणूक थेट लोकसभा संपल्यानंतरच घेण्यात येईल. असे संबंधीत इच्छुकांना सांगण्यात आले. प्रदेश पातळीवरच हा निर्णय झाला आहे. त्यामुळे शहरजिल्हाध्यक्ष या पदासाठी बांशिंग बांधून बसलेल्यांनी आता लोकसभेत चांगले काम करून दाखवा असेही सुनावले. लोकसभा निवडणुकीत चांगले काम केल्यास तुमचा शहरजिल्हाध्यक्ष पदासाठी विचार करू असेही वरिष्ठांनी सांगितले आहे.

शिवसेनेच्या आंदोलनाला यश आता एका गावात दोन छावण्या


नगर । प्रतिनिधी - राज्यात खरीप हंगाम सन 2018-2019 मध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या भागात तातडीने एका गावात एक छावणी सुरू करण्याचे आदेश दिले होते. परंतु नगर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता जास्त असून जनावरांची संख्याही मोठी आहे. एका गावात 500 पेक्षा जास्त जनावरे असल्यास त्याच गावात दुसरी छावणी सुरू करण्याची मागणी नगर दक्षिणमधील शिवसेनेच्या नेत्यांनी केली होती. या आंदोलनात शिवसेना उपनेते अनिल राठोड, जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेने दिलेल्या निवेदनाचा आधार घेत आज महसूल विभागाने एका गावात दोन छावण्या सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यासंदर्भातील आदेशही जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. 
महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, एका महसूल मंडळामध्ये एकापेक्षा अधिक चारा छावण्या उघडण्याची गरज असल्याची जिल्हाधिकार्‍यांना खात्री पटल्यास एका महसूल मंडळामध्ये एकापेक्षा अधिक चारा छावण्या उघडण्याबाबत निर्णय देण्यात आला आहे.
एका गावात चारा छावणी उघडल्यानंतर त्या चारा छावणीतील जनावरांची संख्या कमाल 500 पर्यंत पोचल्यास त्याच गावामध्ये दुसरी छावणी उघडण्यास परवानगी मिळणार आहे.  याच मागणीसाठी नगर जिल्हा शिवसेनेच्यावतीने नगर जिल्हाधिकारी यांच्या दारात आंदोलन केले होते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन मागविले होते. नगर जिल्ह्यातील जनावरांची संख्या पाहता एका गावात दोन छावण्यांची परवानगी महसूल विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर यांनी दिली आहे.

मनपाच्या मार्केट विभागाची साडेबारा लाखांची फसवणूक


नगर । प्रतिनिधी - महापालिकेच्या रस्ता बाजू शुल्कचे वसूल केलेले व दंडाचे असे एकूण साडेबारा लाख रुपये न भरता स्वत:च्या फायद्याकरिता वापरुन अपहार करुन मार्केट विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी ठेकेदार वैभव रवींद्र खापरे (रा. विनायकनगर) याच्याविरुध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा प्रकार 7 जुलै 2018 ते 29 जानेवारी 2019 या कालावधीत घडला. दरम्यान, या प्रकरणात आयुक्त राहुल द्विवेदी यांनी मार्केट विभाग प्रमुख कैलास हरिभाऊ भोसले याला नुकतेच निलंबित केले होते. आता गुन्हा दाखल करत आयुक्त द्विवेदी यांनी ठेकेदारालाही चांगलाच दणका दिला आहे.
याबाबत सविस्तर असे की, मनपाचे मार्केट विभाग शहरातील फेरीवाल्यांकडून रस्ता बाजू शुल्क वसूल करते. यासाठी मनपा खाजगी ठेकेदाराला नियुक्त करते. रस्ता बाजू शुल्कसाठी अक्षय संजय सुपेकर यांनी निविदा दाखल केली होती. मात्र सुपेकर यांनी वैभव खापरे यांना संमतीपत्राद्वारे हा ठेका दिलेला होता. त्यानुसार ठेकेदार वैभव खापरे यांनी रस्ता बाजू मांडणी फी व स्लॉटर फीची वसूल केलेली रक्कम मनपात दर आठवड्याला हप्ते भरणे आवश्यक होते. निविदेतील अटीप्रमाणे ठेकेदार खापरे याने 10 लाख 6 हजार 641 रुपये कर मनपात भरणे आवश्यक होते. मात्र ती न भरल्याने करारनाम्याप्रमाणे 24 टक्के दंड म्हणजे दोन लाख 41 हजार 594 रुपये अशी एकूण 12 लाख 48 हजार 235 रक्कम मनपाच्या मार्केट विभागात जमा न करता स्वतःच्या फायद्याकरिता वापरुन रकमेचा अपहार करुन फसवणूक केली मनपाच्या मार्केट विभागाची साडेबारा लाखांची फसवणूक
आहे. याबाबत मनपाच्या मार्केट विभागातील कर्मचारी गयाजी सुंदर झिने (वय 56, रा. केडगाव) यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस सबइन्स्पेक्टर नयन पाटील हे करत आहेत.

Tuesday, 26 February 2019

मसाप सावेडी शाखेच्यावतीने रेणावीकर विद्यालयात उद्या ’लेखक तुमच्या भेटीला’ कार्यक्रमाचे आयोजन


नगर । प्रतिनिधी - मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद सावेडी उपनगर शाखा व शांतिकुमार फिरोदिया मेमोरियल फौंडेशनच्यावतीने बुधवार दि. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता रेणावीकर माध्यमिक विद्यालयामध्ये ‘लेखक तुमच्या भेटीला’ या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मसाप सावेडी शाखेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी दिली. 
इयत्ता आठवीच्या मराठीच्या पुस्तकात समावेश असलेल्या ‘गोधडी’ या कवितेचे कवी डॉ. कैलास दौंड हे लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधणार आहेत. यावेळी डॉ. कैलास दौंड यांच्यासह विविध शाळेतील मराठी विषय शिकविणार्‍या शिक्षकांचाही सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमास रेणावीकर विद्यालयाचे विशेष सहकार्य लाभले आहे.
श्रीमती आशाताई फिरोदिया, सौ.अर्चना कुलकर्णी, लेखक सदानंद भणगे, चंद्रकांत पालवे, भालचंद्र बालटे, सुरेश चव्हाण व रेणाविकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एन. वसावे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार  असल्याची माहिती मसाप सावेडी उपनगर शाखेचे प्रमुख कार्यवाह जयंत येलुलकर यांनी दिली.

एफ.सी.ए. अ‍ॅकॅडमीचे 3 विद्यार्थी राष्ट्रीय गुणवत्तायादीत




नगर । प्रतिनिधी - द इन्स्टीट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया, न्यु दिल्ली यांच्या वतीने डिसेंबर 2018 मध्ये घेण्यात आलेल्या सी.एस.फौंडेशन परीक्षेत एफ.सी.ए.अ‍ॅकॅडमीची चंचल नवलानी भारतातून नववी, निहारीका राक्षसभुवनकर 20वी तर गौतम गांधी हा भारतात 25 वा आला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना एफ.सी.ए.अ‍ॅकॅडमीचे संचालक सी.ए.पवनकुमार दरक व सी.ए.शबनम हर्दवानी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
एफ.सी.ए.अ‍ॅकॅडमी गेल्या 11 वर्षांपासून नगर शहरात सी.ए.व सी.एस.साठी मार्गदर्शन करणारी अग्रगण्य अ‍ॅकॅडमी आहे.
दरवर्षी या अ‍ॅकॅडमीचे विद्यार्थी भारतात गुणवत्ता यादीत येतात. येथे सी.ए. व सी.एस.चे सर्व विषय 100% ींरलश ीें ींरलश शिकविले जातात.

परीक्षांविषयी सकारात्मक रहा ः प्रा. मकरंद खेर


नगर । प्रतिनिधी - परीक्षा या आपला झालेला अभ्यास तपासण्याचे माध्यम असून, त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहावे. उत्तम ते करावे. शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांमधील उत्तम गुण हेरुन ते वाढविण्यासाठी प्रयत्नशील असतात. जीवनात खूप मोठे व्हा... आनंद जगा.. आशिर्वादरुपी पाठीवर हात ठेवणार्‍या शिक्षकांना, शाळेला व आई-वडिलांना कधीही विसरु नका, असे  प्रतिपादन प्रा.मकरंद खेर यांनी केले.
हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयातील इ.10वी च्या विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी नुकत्याच विद्यालयाच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून मार्गदर्शन करतांना प्रा.मकरंद खेर बोलत होते. कार्यक्रमास स्नेहालयाचे हनिफ शेख, पालक खेमसिंह राजपूत, सारडा महाविद्यालयाचे प्रा.रिक्कल आदी उपस्थित होते.
शिक्षक श्री.कसबे यांनी विद्यार्थ्यांना आजची सत्य परिस्थिती विविध उदाहरणांच्या माध्यमातून सांगतांना आपले वागणे, समाजाभिमुख असावे. फॅशनच्या प्रवाहात स्वत:चे अस्तित्व विसरु नये. सौ.वृषाली जोशी यांनी कष्ट, प्रयत्न आणि संधी यांच्या माध्यमातून खूप मोठे होण्याच्या शुभेच्छा देतांनाच तुमची शालेय धावपट्टीवरचे धावणे या परीक्षेनंतर थांबणार असून, आता मोठी भरारी घ्या. उंचीवर स्थिर होईपर्यंत थांबू नका, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मधुकर साबळे यांनी केले. विद्यालयाविषयी स्वयंस्फूर्तीने चि.राजपूत आशुसिंह, कु.शेख आरशीन, नेहा सांकला, प्रतिमा गायकवाड, साक्षी बिट्टे, बिराजदार आनंद, प्रतीक्षा साळवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 
कार्यक्रमाचे नियोजन दीपक शिरसाठ, सुखदेव नागरे, श्रीमती क्रांती कुंदनकर, विनोद जोशी, लहू घंगाळे, संजय शेकडे, व्ही.एस.कुलकर्णी आदींनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.भालेकर यांनी केले तर आभार शिरसाठ यांनी मानले. यावेळी पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने ुपस्थित होते.

शहर भाजपच्या पदाधिकार्‍यांकडून ‘मोदी...मोदी...’ चा जयघोष


नगर । प्रतिनिधी - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामांमुळे व घेतलेल्या महत्वाच्या निर्णयामुळे  भारताची प्रतिमा संपूर्ण जगात उंचावली आहे. या आधीच्या पंतप्रधांनापेक्षा अधिक बहुमान भारताचे पंतप्रधान म्हणून मोदी सर्वत्र मिळवत आहेत. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्व व धाडसी स्वभावामुळे संपूर्ण जगात नरेंद्र मोदींचे चाहते आहेत. ‘मन की बात’ च्या माध्यमातून त्यांनी सर्वात मोठे संपर्क अभियान राबवले आहे. बुथप्रमुखांना या माध्यमाद्वारे आज केलेले मार्गदर्शन फार मोलाचे होते, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील रामदासी यांनी केले.
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच ‘मन की बात’ या आपल्या अनोख्या संपर्क अभियानाच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधला. तसेच देशातील भाजपाच्या बूथ प्रमुखांना आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुमोल मार्गदर्शन करून संबोधित केले. या जाहीर कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. नगरमध्ये शहर भाजपच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोदींची ‘मन की बात’ ऐकण्यासाठी  खा.दिलीप गांधी यांच्या संपर्क कार्यालयात मोठा स्क्रीन लावून व स्पीकरची व्यवस्था करण्यात आली  होती. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. मोदींच्या प्रभावी भाषणामुळे उपस्थित सर्वजण सतत टाळ्या वाजवून व मोदी... मोदी..., भारतमाता की जय... अशा घोषणा देऊन त्यांच्या भाषणास दाद देत होते. भाषण संपल्यानंतर सर्वांनी उभे राहून टाळ्या वाजून मोदींच्या या प्रभावी भाषणाची वाहवा केली. त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील रामदासी यांनी छोटेखानी भाषणात या सभेचे कौतुक केले.
यावेळी उपमहापौर मालन ढोणे, उपाध्यक्ष श्रीकांत साठे, सरचिटणीस किशोर बोरा, सुवेंद्र गांधी, नगरसेवक मनोज कोतकर, स्वप्नील शिंदे, अजय चितळे, प्रशांत मुथा, गणेश ननावरे, चेतन जग्गी, किशोर वाकळे, विश्वनाथ पोंदे, वसंत राठौड, कालिंदी केसकर, शिवाजी दहिहंडे, संतोष शिरसाठ, नरेश चव्हाण, शुभांगी साठे, दिगंबर ढवण, दामोदर माखीजा, सुनील तावरे, नाना भोरे, अमित गटणे, चंदन बारट्टक्के, उमेश साठे, अभिजित चिप्पा, प्रकाश सैदर, रोषण गांधी, ज्ञानेश्वर जंगम, महेश सब्बन, चंद्रकांत रेणावीकर, गोपाल वर्मा आदी उपस्थित होते.

वकिली व्यवसाय करताना नीतीमूल्ये आणि आचारसंहिता पाळणे गरजेचे : न्या. साधना जाधव


नगर । प्रतिनिधी - वकिली हा एक पवित्र व्यवसाय असून, या व्यवसायातील तत्त्वे, आचारसंहिता काटेकोरपणे पाळली जाणे अपेक्षित आहे. वकिली व्यवसायाची पत समाजात घसरू नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन न्या. साधना जाधव यांनी केले. 
न्या. एस. बी. म्हसे पा. राज्यस्तरीय दोनदिवशीय अभिरूप न्यायालय स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे सहसचिव अ‍ॅड. व्ही. डी. आठरे पा. होते. व्यासपीठावर संस्थेच्या विश्वस्त अ‍ॅड. दीपलक्ष्मी म्हसे पा., जिल्हा न्या. के. व्ही. बोरा, न्या. इटळकर, अ‍ॅड. माणिक मोरे, अ‍ॅड. सुभाष भोर, अ‍ॅड. माधवेश्वरी म्हसे, प्राचार्या राजेश्वरी म्हसे, जी. के. पाटील, प्राचार्य एम. एम. तांबे, अ‍ॅड. निर्मला चौधरी, अ‍ॅड. शहाजी दिवटे आदी उपस्थित होते.
न्या. जाधव म्हणाल्या की, वकिली व्यवसाय करताना पुणे-मुंबईसारख्या महानगरव्यतिरिक्त  विचार करून सामान्यांपर्यंत न्याय कसा पोहोचला पाहिजे, याचे विविध दाखले देऊन जाणीवपूर्वक प्रयत्न करणेही कर्तव्य भावना ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एम. एम. तांबे यांनी केले. स्वागतपर भाषणात अ‍ॅड. माणिक मोरे यांनी स्पर्धेचा आढावा घेऊन संस्था अशा स्पर्धांना सातत्याने प्रोत्साहन देत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अ‍ॅड. व्ही. डी. आठरे यांनी न्यायव्यवस्था ही एकमेव सर्वसामान्य लोकांसाठी आधारस्तंभ म्हणून पुढे येत असल्याचे सांगितले. विधी शिक्षण आणि वकिली व्यवसायातून जनतेसाठी आपण काही तरी केले पाहिजे. ही भावना बळावते व त्यामुळे लोकांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास वाढत असल्याचे वेगवेगळे संदर्भ देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
स्पर्धेचा निकाल असा ः  प्रथम -  नवलमल फिरोदिया कॉलेज, पुणे (चषक व रोख 9 हजार रुपये), द्वितीय - भारती अभिमत विद्यापीठाचे न्यू लॉ कॉलेज, पुणे (चषक व रोख 7 हजार), उत्तेजनार्थ - शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज, पुणे, बेस्ट अ‍ॅडव्होकेट - तुषार शिंदे (शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज, पुणे), बेस्ट मेमोरियल अ‍ॅवार्ड - भारतीय अभिमत विद्यापीठाचे न्यू लॉ कॉलेज, पुणे.

नगर ते सोलापूरवाडी मार्गावर हायस्पीड इंजिनची चाचणी

 

नगर । प्रतिनिधी - नगर तालुक्यातील नारायणडोह ते सोलापूरवाडी (ता. आष्टी) यादरम्यान हायस्पीड इंजिनची सात डबे जोडून सोमवारी चाचणी घेण्यात आली.
यावेळी रेल्वे सुरक्षा आयुक्त (मध्य रेल्वे) ए.के. जैन, मुख्य प्रशासकीय अधिकारी निर्माण (मध्य रेल्वे) एस.के. तिवारी, मुख्य अभियंता निर्माण (मध्य रेल्वे) दिनेश कटारिया, मंडल रेल्वे प्रबंधक (सोलापूर) हितेंद्र मल्होत्रा, रेल्वेचे उपमुख्य अभियंता (नगर) चंद्रभूषण, कार्यकारी अभियंता व्ही.पी. पैठणकर, वरिष्ठ अनुभाग अभियंता विद्याधर धांडोरे, एस.आर. कुंवर, श्रीराम कंट्रक्शनचे संचालक सुरेश पेनसीलवार, आनंद पेनसीलवार, दिलीप पेनसीलवार आदी उपस्थित होते.
अहमदनगर - नारायणडोह - सोलापूरवाडी या रेल्वेमार्गावर ताशी 120 किमी या वेगाने रेल्वे धावली. ही चाचणी यशस्वी झाली असून, अहमदनगर ते सोलापूरवाडी रेल्वे आता धावू शकणार असल्याचे रेल्वे विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

घरकुल वंचितांच्या प्रकल्पासाठी खा. गांधी यांनी केली म्हाडाच्या अधिकार्‍यांसह निंबळक- इसळक शिवाराची पाहणी


नगर । प्रतिनिधी - पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून लॅण्ड पुलिंगद्वारे संयुक्त भागीदारी तत्वावर घरकुल वंचितांचा प्रकल्प साकारण्यासाठी म्हाडाचे नाशिक विभागाचे मुख्य अभियंता दिनेश श्रेष्ठ, घनश्याम सोनार व खासदार दिलीप गांधी यांनी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या शिष्टमंडळासह सोमवारी निंबळक, इसळक शिवारातील खडकाळ पड जमिनीची पाहणी केली. 
यावेळी  कॉ.बाबा आरगडे, अ‍ॅड.कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, निंबळकचे माजी सरपंच विलास लामखडे, इसळकचे सरपंच रावसाहेब गेरंगे, बाळासाहेब पोटघण, विठ्ठल सुर, शाहीर कान्हू सुंबे, शिवाजी खामकर, रघुनाथ आंबेडकर, सखुबाई बोरगे, अंबिका नागुल, हिराबाई ग्यानप्पा, संगीता घटे, सुमन जोमदे, आश्विनी रोकडे आदिंसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 
म्हाडाचे अधिकारी दिनेश श्रेष्ठ यांनी सदर जागा घरकुल प्रकल्पासाठी उपयुक्त असून, शासनाकडे प्रस्ताव सादर करुन हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 500 स्क्वे. फूट जागेवर 325 स्क्वे. फूट बांधलेल्या घरांचे स्वरुप रो-हाऊसिंग पध्दतीने असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विलास लामखडे यांनी या परिसरातील जमीन उपजाऊ नसल्याने घरकुल वंचितांचा प्रकल्प उत्तमपणे साकारला जाणार असून, एमआयडीसी जवळ असल्याने रोजगाराचा प्रश्न देखील सुटणार असल्याचे सांगितले. 
यावेळी उपस्थित जागामालक सुरेंद्रसिंग धुप्पड व भीमराव कानडे यांनी या प्रकल्पासाठी जागा देत असल्याचे जाहीर केले. तर या प्रकल्पाला इतर शेतकरी जागा देण्यास तयार असल्याचे सांगितले. 
खा.दिलीप गांधी यांनी गोरगरिबांचे हित पहाणारे सरकार सत्तेवर असून, लवकरच घरकुल वंचितांचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे. 2022 पर्यंन्त सर्वांना घरे देण्याचा सरकारचा मानस आहे. इसळक, निंबळक येथे पूर्ण नियोजन करुन नवीन नगर वसविण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून घरकुल वंचितांच्या घरांचा स्वप्न साकार होणार असल्याचे सांगून, घरांचा प्रकल्प उभारण्यासाठी व मूलभूत सुविधा निर्माण करुन देण्यासाठी सर्वपरीने प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
प्रकाश थोरात यांनी सरकारकडे आर्थिक निधी व जागा नसल्याने पंतप्रधान आवास योजना रखडली होती. लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून सरकारला जागा संपादित न करता जमीन उपलब्ध होणार असल्याने ही योजना कार्यान्वीत होणार असल्याचे सांगितले.

पोलीस भरतीत होणार प्रथम लेखी परीक्षा


नगर । प्रतिनिधी- पोलीस भरती प्रक्रियेमध्ये आता प्रथम लेखी परीक्षा घेतली जाणार आहे, असे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचार्‍यांच्या कामाच्या स्वरुपात बदल झालेला असल्याने पोलीस शिपाई पदावर बुध्दिमान उमेदवारांची निवड होण्याची आवश्यकता, पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणी दरम्यान होणार्‍या दुर्घटनना या बाबी विचारात घेऊन राज्य शासनाच्या गृह विभागाने नुकताच एक आदेश काढला आहे. त्यानुसार भरती प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आला आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवर रिक्त होणार्‍या पदांच्या प्रमाणात आवश्यक तेवढ्याच योग्य उमदेवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलविण्यात येणार असल्याने भरती प्रक्रिया दीर्घकाळ सुरु न राहता जलद गतीने पार पडेल. त्यामुळे जिल्ह्याबारहेरील उमेदवारांना जास्त दिवस ताटकळत रहावे लागणार नाही. भरती प्रक्रियेत केेलेल्या बदलांचा फायदा उमेदवारांना निश्चितच होईल.

बिंगो जुगारावर छापा


नगर । प्रतिनिधी- तोफखाना हद्दीत सुरु असलेल्या बिंगोची व्याप्ती आता सारसनगरमध्येही पोहचली आहे. सारसनगर येथील बिंगो जुगारावा अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पाथकाने छापा टाकून 14 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि बिंगो जुगाराचे साहित्य असा एकुण 2 लाख 9 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
योगेश सुरेश खैरनार (वय 32, रा. चौधरी नगर, सोलापुररोड), शहानवाज नन्नीखान पठाण (वय 32 रा. पिंजारगल्ली), अशोक कोंडीबा गिते (वय 49, र. चिपाडेमळा, सारसनगर), देवीदास एकनाथ शिंदे (वय वय 35, रा. चिपाडेमळा, सारसनगर), बाळाासाहेब दिगंबर टाक (वय , वाघ गल्ली, नालेगाव), रावसाहेब शिंदुपंत काटे (वय 47, रा. सौरभनगर, भिंगार), अंबादास ढाकणे (वय 34, रा. सारसनगर), शेख इरफान गफ्फार (वय 19, पिंजारगल्ली),जालिंदर नवनाथ चितळे (वच, 48, रा. चितळवाडी, पाथर्डी), आसिफ रसुल सय्यद ( वय 45, रा. मंगलगेट हवेली, नगर), शिवाजी बबन मांडे (वय 46, रा. भवानी नगर, मार्केटयार्ड), निलेश मारुती जायभाय (वय 23, रा.त्रिमुर्ती चौक, सारसनगर), अल्ताफ चॉदखाँन पठाण (वय 22, साई कॉर्नर, सारसनगर), यांना अटक करण्यात आले आहे. तर मालक विजय जगताप (रा.सारसनगर ) याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार झाला आहे. 
मार्केटयार्डजवळ हा जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलीसांना मिळाली त्यानुसार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संदीप मिटके, परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक पुनम पाटील, हवलदार संजय घोरपडे, सचिन जाधव, बाबासाहेब फसले, सागर द्वारके, बाळासाहेब मासाळकर, राजेंद्र फसले, यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली.

Monday, 25 February 2019

विनाक्रमांकाच्या पावती पुस्तकांमुळे सावेडी तलाठी कार्यालयात अनागोंदी


नगर । प्रतिनिधी - विनाक्रमांकाच्या पावती पुस्तकाद्वारे कामकाज चालत असल्याने सावेडी तलाठी कार्यालयातील अनागोंदी समोर येत असून, त्यातून प्रशासकीय कारभाराचा बट्ट्याबोळ झाला आहे. कार्यालयातील ‘झिरो तलाठी’ ही बनावट पावती पुस्तके छापून त्याद्वारे कर आकारणीच्या पावत्या देतात. या पावत्यांचे कुठलेही ऑडिट होत नसल्याचा गैरफायदा घेत या माध्यमातूनही शासनाची फसवणूक केली जात आहे.
सावेडी तलाठी कार्यालयाच्या कारभाराचा ‘अहमदनगर घडामोडी’ने गेल्या चार दिवसांपासून पर्दाफाश केल्याने महसूल विभागात एकच चर्चेचा विषय झाला आहे. 
सावेडी तलाठी कार्यालयात गेल्या अनेक महिन्यांपासून झिरो तलाठ्यांमुळे अनागोंदी कारभार सुरू आहे. येथील झिरो तलाठी असलेल्या सुनीलच्या माध्यमातून बनावट पावती पुस्तके आणली जातात. त्या पावत्यांद्वारेच नागरिकांना कर आकारणीसंदर्भात पावत्या दिल्या जात आहेत.
 मात्र, या पावत्या कोठून आणल्या जातात याचीही चौकशी होणे आवश्यक आहे. या पावत्यांवर कुठलाही सिरीअल नंबर नसल्याने नागरिकांकडूनही त्याचा आग्रह धरला जात नाही. 
याचाच गैरफायदा घेतला जात आहे.

हरिषराव, तुम्हाला तर खुले आव्हान
वर्षानुवर्षांची थकीबाकीदारांची यादी जाहीर करुन त्यांनी अशा बड्या थकबाकीदारांकडून कर वसुली करावी. वर्षानुवर्षे थकबाकीदारांची यादी प्रसिध्द न करता त्यांच्याकडून केवळ मागील वर्षाची थकीत कर आकारणी केली जात आहे. त्यामुळे हरिषराव तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासूनच्या थकबाकीदारांची यादी जाहीर करुन त्यांच्याकडून लगेच कर वसुली करुन दाखवावी.

एकच फंडा, पेन्सिल आणि खोडरबर
कर वसुली करताना झिरो तलाठ्यांकडून पेन्सिल आणि खोडरबरचा सर्रास वापर केला जातो. बड्या थकबाकीदारांना वसुली करताना पेन्सिलवर आकडेवारी मांडून नंतर त्यांचा सोयीस्कर भरणा केला जातो. ही सर्व प्रक्रिया झिरो तलाठ्यांच्या माध्यमातून होत असताना सुनीलचे लक्ष मात्र मलिदा गोळा करण्यावरच असते.

त्या झिरोंची पाठराखण कशासाठी?
झिरो तलाठ्यांच्या माध्यमातून अनागोंदी कारभार चालत असून त्यांची येथून हकालपट्टी करण्याऐवजी त्यांची पाठराखण केली जात आहे. हा अत्यंत गंभीर प्रकार असताना प्रांत मॅडम यांनी या प्रकरणाची गंभीर चौकशी समिती नेमून कारवाईचा बडगा उगारला पाहिजे.

इशू सिंधू नगरचे नवे पोलीस अधीक्षक


नगर । प्रतिनिधी- जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. रंजनकुमार शर्मा यांची नागपुर येथे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनच्या निवासी उपायुक्तपदावर असलेले इशू सिंधू यांची नगरच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. राज्यातील 10 आयपीस अधिकार्‍यांच्या बदल्या राज्य गृह विभागाने केल्या. त्यामध्ये सिंधू यांची नगरच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती केली आहे.
डॉ. रंजनकुमार शर्मा यांनी 1 मे 2017 रोजी नगरच्या पोलीस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात मोहरम आणि गणेशोत्सव अत्यंत शांततेत पार पडले. तसेच महापालिका निवडणुकीलाही कोणतेही गालबोट लागले नाही. त्यामुळे नगरमध्ये त्यांची चांगली लोकप्रियता झाली होती. केडगाव येथील दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयावर झालेला हल्ला ही दोन्ही प्रकरणे त्यांनी अत्यंत कुशलतेने हाताळली. 
इशू सिंधू हे सध्या नवी दिल्ली येथे महाराष्ट्र निवासी उपायुक्त होते.
सिंधू यांनी यापूर्वी औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक, नागपूर पोलिस उपायुक्त, जळगाव अप्पर पोलिस अधीक्षकपदी काम केले आहे. सिंधू यांनी जळगाव येथे अप्पर अधीक्षक असताना माजी मंत्री सुरेश जैन आरोपी असलेल्या घरकुल घोटाळ्याचा तपास केला होता. त्यांनी औरंगाबाद, नागपूर व जळगाव येथे धडाकेबाज कामगिरी केलेली आहे.

नवलेनगरला गजानन महाराज पालखी मिरवणूक


नगर । प्रतिनिधी - सावेडी उपनगरातील गुलमोहोर रोडवरील नवलेनगरला श्री गजानन महाराज मंदिरात प्रकटदिन सोहळा मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणा साजरा झाला. या सोहळ्यानिमित्त रविवारी हनुमान चालिसाचा भक्तांनी लाभ घेतला.
प्रकटदिनी सकाळी 6 वा. मंदिरात लघुरुद्राभिषेक होऊन सकाळी 9 ते 12 परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. दुपारी 12 ते 12.30 महाआरती होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. महाप्रसादानंतर श्रुती संगीत निकेतनचा भजनसंध्येचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाविकांनी दर्शन, महाप्रसाद व कार्यक्रमाचा ंलाभ घेतला. सेवेकरी नवलेनगर रहिवासी सेवा संस्थेच्यावतीने कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

धरमपुरीत भाविकांची मांदियाळी


नगर । प्रतिनिधी -  तालुक्यातील निंबळक येथील श्रीक्षेत्र धरमपुरी येथे श्री संत गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दुपारी पालखी मिरवणुकीने मंदिर प्रदक्षणा घालण्यात आली. महाआरती होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाविकांची  मोठी गर्दी झाली होती.
श्रीक्षेत्र धरमपुरी येथे शेगांवप्रमाणेच 1999 साली श्री संत गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली असून, गेल्या 19 वर्षांपासून प्रकट दिन व धार्मिक उत्सव साजरे होतात. प्रति शेगांव म्हणून श्रीक्षेत्र धरमपुरी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. दरवर्षी प्रकट दिनाला जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी येथे येतात.
श्रीक्षेत्र धरमपुरी संस्थानच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसाद व दर्शनाची चांगली व्यवस्था केल्याने हजारो भाविकांनी भक्तीमय वातावरणात प्रकट दिनाचा आनंद घेतला.

सैनिकांनी दिलेले बलिदान विसरु नये ः डॉ. कांकरिया


नगर । प्रतिनिधी - दैनंदिन जीवनात वावरतांना आम्ही रोज अनेक चुका करत असतो. कायदे मोडत असतो व या सर्व बाबी आमच्याकडून कळत  न कळत रोज सरास घडत आहे व त्या गोष्टींचा आम्हाला पश्चातापही नाही. पण याउलट जर आम्ही आमच्या सैनिकांचे जीवनमान बघितले तर आम्हाला जाणीव होईल की, ते कधीही देशाच्या कायदा मोडण्याचे धाडस करत नाही. आपल्याकडून काही चुकीचे घडू नये, ज्यामुळे साधारण माणसाचे किंवा देशाचे काही नुकसान होणार नाही याची ते फार काळजी घेतात. अशा या सैनिकांनी अनेक वेळा आपल्या परिवाराचा विचार न करता नेहमी देश व देशवासियांच्या सुरक्षेसाठी आपल्या जीवनाचे बलिदान दिले आहे. देशवासियांनी त्याला कधीही विसरु नये, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सुधा कांकरिया यांनी केले.
अहमदनगर शहरातील अनेक हौशी गायक, वादक, कलाकारांनी मिळून जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे शहिद झालेल्या जवानांना गोविंदपूरा येथे अ‍ॅड.अमिन धाराणी यांच्या लॉनमध्ये देशभक्ती गती संध्येने शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी गिटार वादक वृषाल एकबोटे यांनी शहीद झालेल्या परमवीरचक्र मिळालेल्या अनेक सैनिकांच्या स्वत:  रंगवलेल्या फोटोंचे प्रदर्शन लावण्यात आले व मेणबत्त्या पेटवून गिटारवर ‘दिल दिया है जान भी देंगे.. ऐ वतन तेरे लिये’ हे गीत सादर केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सुधा कांकरिया, अजय चितळे, नितीन शेलार, अ‍ॅड.गुलशन धाराणी, उद्योजक वसंत बोरा, प्रा.अपर्णा बालटे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड.अमीन धाराणी यांनी केले. मनोगत कलाशिक्षक प्रमोद रामदीन यांनी केले.
शौकत विराणी यांनी ‘जिंदगी मौत न बन जाये संभालो यारों.. ’ हे गीत सादर केले तर आशुतोष देवी, प्रा.अपर्णा बालटे, वसंत बोरा, समीर धाराणी, किरण वैकर, अनिल आंबेकर व सर्व गायकांनी मिळवून ‘कर चले हम फिदा जानोतन साथीयो...’ हे गीत सादर करुन देशभक्ती गीत श्रद्धांजली कार्यक्रमाची सांगता केली. 
कार्यक्रमास प्रफुल्ल गायकवाड, विवेक भारताल, प्रशांत वंडगर, मूर्तीकार गणेश गुडा, समाजसेवक भीमराज कोडम, राजू मंचे, आबीद खान आदी मान्यवर मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. शेवटी साहिल धाराणी यांनी आभार मानले. 

इंडस वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थांचा सर्वांगीण विकास ः यादव


नगर । प्रतिनिधी - इंडस वर्ल्ड स्कूलच्या माध्यमातून वर्षभर नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. अशा उपक्रमामुळे विद्यार्थांचा सर्वांगीण विकास होतो, असे मत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक परिक्षीत यादव यांनी केले. 
इंडस वर्ल्ड स्कूलच्या इंडोत्सव 2019 चे उद्घाटन यादव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. संस्थेचे संचालक विनायक देशमुख, प्रभारी प्राचार्य कविता सुरतवाला, विविध विषयांच्या शिक्षकांबरोबरच क्रीडाशिक्षक व पालक उपस्थीत होते. प्रारंभी पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 
गतवर्षी दहावीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी रोहन साळुंके व अमित चव्हाण, मुलींमध्ये प्रथम आलेल्या ज्ञानदा मानेराव यांना स्व. सुधाकर देशमुख, स्व. भाऊसाहेब कर्डिले, स्व. रामचंद्र धस यांच्या स्मरणार्थ व प्रथम प्राचार्य प्रगती कपूर यांच्या वतीने रोख पारितोषिके देण्यात आली. या वर्षीचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार आदित्य मिरगणे यास देण्यात आला. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या यशश्री शेळके, मंदार म्हस्के, वरूण शेटे, ध्रुव वाघ, आदेश शेवाळे, अब्दुल शेख, ओम स्वामी, सार्थक गोरे, तेजस्विनी मिरगणे यांचा विषेश सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी ध्रुव वाघ, श्रद्धा ठाकूर, ब्युटी सिंग, समृध्दी गांधी यांनी केले.

डिजीटल वर्गासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांनी दिला शाळेला एलईडी टीव्ही भेट


नगर । प्रतिनिधी - ध्येय नसलेले आयुष्य निरर्थक आहे. जीवनात ध्येय ठेवून त्याच्या प्राप्तीसाठी जिद्द व चिकाटी अंगीकारल्यास यश निश्चित मिळते. स्पर्धामय युगातील विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोवर चौफेर ज्ञान असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच नवीन ज्ञान आत्मसात करण्याची आवड असली पाहिजे. कष्ट व एकाग्रतेने ज्ञान आत्मसात होत असते. फक्त परीक्षार्थी न बनता ज्ञानार्थी बनण्याचे आवाहन सीए विजय मर्दा यांनी केले. 
सारसनगर येथील कै.दामोधर विधाते प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शैक्षणिक वर्ष 2018-19 च्या दहावी मधील विद्यार्थ्यांच्या निरोप कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय भाषणात मर्दा बोलत होते. 
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सरचिटणीस शिवाजी विधाते, विद्यालयाचे मुख्यध्यापक शिवाजी म्हस्के, शोभा गाडगे, संतोष सुसे, सविता सोनवणे, गिते मॅडम, सचिन बर्डे, लता म्हस्के, विजय जावळे, भाऊसाहेब पुंड, योगेश दरवडे, राधाकिसन क्षीरसागर, वैष्णवी रेखी, साबळे आदींसह शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 
पुढे मर्दा म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखून पुढील शैक्षणिक वाटचाल ठरवावी. दहावी ही यशाची पहिली पायरी असून, ही एक संधी आहे. गेलेली वेळ परत येणार नसल्याने विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळविण्यासाठी अभ्यास करण्याचे सांगितले. 
शिवाजी विधाते म्हणाले की, शाळेला गुणवत्तेची उज्वल परंपरा आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुले या शाळेत शिकत असले तरी ज्ञानाने सर्व विद्यार्थी श्रीमंत आहे. यासाठी सर्व अध्यापक वर्ग कष्ट घेत असून, दहावीचे विद्यार्थी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 
विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना शाळेने दिलेले संस्कार व ज्ञानाची उतराई होणार नसून, ज्या शाळेत लहानाचे मोठे झालो, त्या शाळेपासून दुरावणार असल्याचे दु:ख व्यक्त केले. तर दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांनी जमवलेल्या पैश्यातून शाळेच्या डिजीटल क्लासरुमसाठी एलईडी टीव्ही भेट दिला. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल मेहेत्रे यांनी केले. आभार सारिका गायकवाड यांनी मानले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.