Monday, 22 April 2019

होमिओपॅथी उपचार पध्दती आनंदी जीवनशैलीचा मंत्र


नगर । प्रतिनिधी -
होमिओपॅथी जगात लोकप्रिय असलेली सर्वमान्य उपचार पध्दती आहे. या उपचारांतून आजार तर बरा होतोच याशिवाय निरोगी जीवनशैलीचाही मंत्र मिळतो. नगरमध्ये डॉ.बोरा होमिओपॅथी क्लिनिक अशीच निरोगी व आनंदी जीवनशैली सर्वांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न मागील पंधरा वर्षांपासून करीत आहे. याचा असंख्य रूग्ण लाभ घेत आहेत. विविध आजार तपासणी व उपचार शिबिरांच्या माध्यमातून या क्लिनिकने हाती घेतलेले कार्य खर्या अर्थाने वैद्यकीय पेशाचाही सन्मान वाढविणारे आहे, असे प्रतिपादन सी.ए.असोसिएशनचे अध्यक्ष सीए डॉ.परेश गांधी यांनी केले.
नगरमध्ये गेल्या दीड दशकापासून होमिओपॅथी उपचार सर्वांना उपलब्ध करून अनेक रुग्णांना व्याधीमुक्त करणार्‍या सारसनगर येथील डॉ.बोरा होमिओपॅथी क्लिनिकच्यावतीने सारसनगरमध्ये विविध आजारांवर होमिओपॅथी उपचारांची विशेष शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांचा समारोप प्रोस्टेट, हर्निया, स्पॉण्डीलायटीसीस तपासणी व उपचार शिबिराने झाला. यावेळी शिबिरासाठी सहकार्य करणारे सुनील चोरबेले यांच्यासह पलक बोरा, मनीषा चोरबेले, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ.प्रतिमा बोरा, डॉ.सचिन बोरा आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ.प्रतिमा बोरा यांनी सांगितले की, 1 ते 13 एप्रिल दरम्यान घेण्यात आलेल्या या शिबिरांचा जवळपास 352 रूग्णांनी लाभ घेतला. विना इंजेक्शन, विना शस्त्रक्रिया परिणामकारक व दुष्परिणाम विरहीत उपचार होमिओपॅथीचे वैशिष्ट्य आहे. या शिबिरांमध्ये मूळव्याध, त्वचारोग, श्वसन समस्या, महिलांचे आजार, किडनी समस्या, केसांच्या समस्या, पोटाच्या समस्या, हाडांचे आजार, मानसिक समस्या, प्रोस्टेट हर्निया, स्पॉण्डीलायटीस अशा अनेक आजारांसह विद्यार्थ्यांच्या समस्या तसेच मतिमंद, गतीमंद मुलांच्या संबंधित समस्यांवर मार्गदर्शन व उपचार करण्यात आले. प्रत्येक शिबिराला रूग्णांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
वेळोवेळी अशी शिबिरे घेवून या अतिशय उपयुक्त उपचार पध्दतीचा लाभ जास्तीत जास्त रूग्णांपर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. डॉ.बोरा होमिओपॅथी क्लिनिकमध्ये सर्व प्रकारच्या कॅन्सर रूग्णांवरही विना शस्त्रक्रिया व विना इंजेक्शन उपचारांची सुविधा आहे. कॅन्सर रूग्णांना वेदनामुक्त व आनंदी जीवन जगता यावे यासाठी होमिओपॅथी पध्दतीने त्यांच्यावर उपचार केले जातात. त्याचाही लाभ अनेक रूग्णांना होत आहे, असेही त्या म्हणाल्या. डॉ.सचिन बोरा यांनी आभार मानले.

दि. 23 ते 25 दरम्यान मास्टर अँड मिस फोटोजेनिक स्पर्धेची ऑडिशन


नगर । प्रतिनिधी -
येथील  प्रतिबिंब  संस्थेच्या वतीने फोटो, मॉडेलिंग, फॅशन, व्यक्तिमत्व सौंदर्य यावर आधारित फोटोजेनिक 2019 स्पर्धा घेण्यात येणार असून तसेच विविध टायटल देण्यात येणार आहेत. त्यासाठीची ऑडिशन दि. 23 ते 25 एप्रिलला रोज दु. 3 ते संध्या. 7 पर्यंत स्पार्कल इन्स्टिट्यूट, स्टेट बँकसमोर, दिल्लीगेट, अहमदनगर येथे होणार आहे.
नगरमध्ये मागील वर्षी साईबनमध्ये बेस्ट फेस ऑफ अहमदनगर सौंदर्य स्पर्धा आयोजित केली होती. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याच धर्तीवर यावर्षी  मास्टर/ मिस्टर/मिस /ि मसेस फोटोजेनिक 2019 स्पर्धा  घेत आहोत अशी माहिती मुद्रा कांबळे यांनी दिली.
स्पर्धा पुढील  गटात घेतल्या जाणार असून जेन्टस -1) 5 ते 15व योगट मास्टर फोटोजेनिक  2) 15 वर्षपुढील मिस्टर  फोटोजेनिक  लेडीज - 1) 5 ते 15 वयोगट लिटिल  फोटोजेनिक 2)  15 ते 25 मिस फोटोजेनिक 3)25 वर्षांपुढील मिसेस  फोटोजेनिक असे गट आहेत.  स्पर्धेत विविध बक्षिसे व टायटल देण्यात येणार आहेत. सहभागी सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
ऑडिशनमधून निवड झालेल्या मुलांना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी खास प्रोफेशनल ट्रेनर आहेत. तसेच त्यांचे फोटोसेशन करून पोर्टफोलिओ अल्बम बनविण्यात  येणार आहेत. नंतर त्यांची फायनल स्पर्धा होणार आहे.
निवड झालेल्या मुलांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. हा सर्व उपक्रम मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी स्पार्कल इन्स्टिट्यूट, स्टेट बँकसमोर, दिल्लीगेट, अहमदनगर.मो. 9822118913 येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शहरात उन्हाचा पारा वाढला


नगर । प्रतिनिधी -
शहरात उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून, तापमान 40 अंशांच्या घरात जात असल्याने नगरकरांच्या जीवाची काहिली होत आहे.
गेल्या दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर उन्हाचा पारा पुन्हा वाढला आहे. तसेच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तीन दिवस उन्हाची तीव्रता जाणवली नाही. शहरात सध्या राजकीय वातावरण जसे जसे तापत गेले तसाच उन्हाचा जोरही वाढत गेला असल्याचे चित्र आहे.
एप्रिल महिना सुरु झाला तशी तापमानात वाढ होण्यास सुरवात झाली. वातावरणातील बदलामुळे तापमान कमी-अधिक होत राहिले. गेल्या आठवड्यापासून शहरातील तापमानाने पस्तीशी ओलांडली आहे. तापमानात वाढ झाल्याने उकाडाही वाढला आहे. दुपारच्या वेळेस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नगरकर घराबाहेर पडणे टाळत आहेत. रविवारी सुटीचा दिवस असूनही शहरातील रस्त्यावर  दुपारी सामसूम दिसत होती. दिवसभराचा उकाडा व त्यात भारनियमनाचा त्रासही सहन करावा लागत आहे.

संत निरंकारी चॅरिटेबलतर्फे बुधवारी रक्तदान शिबिर


नगर । प्रतिनिधी -
निरंकारी मिशनतर्फे बाबा गुरबचन सिंहजी महाराज यांच्या स्मृती दिवसानिमित्त 24 एप्रिल हा दिवस ‘मानव एकता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त बुधवार दि. 24 एप्रिल रोजी संत निरंकारी सत्संग भवन, मिस्कीन रोड येथे सकाळी 10 ते दु. 12.30 यावेळेत सत्संग प्रवचन तसेच संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या नगर शाखेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मिस्कीन रोड, जॉगिंग पार्कसमोरील निरंकारी सत्संग भवन, नगर येथे सकाळी 9 ते दु. 3 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर होईल.
शिबिराचे उद्घाटन डॉ. राहुल धूत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात येईल. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती निरंकारी सेवा दल शिक्षक अनिल टकले यांनी सांगितले. याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, गेल्या 24 वर्षांपासून रक्तदान शिबिर आयोजित केली जात असून, निरंकारी भक्तगण व नागरिक मोठ्या श्रद्धेने येऊन रक्तदान करतात. सिव्हील हॉस्पिटलच्या रक्तपेढीचे या कामी सहकार्य लाभते. तसेच जिल्ह्यातही निरंकारी मंडळाची शाखा असलेल्या ठिकाणी सुद्धा रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात.
मंडळाचे प्रसिद्धीप्रमुख किशोर खुबचंदानी यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की, निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे दि. 24 एप्रिल या एकाच दिवशी देशभरात अनेक ठिक़ाणी रक्तदान शिबिरांचे आयेाजन केले जाणार असून त्याद्वारे एकाच दिवशी 20 हजारहून अधिक युनिटस् रक्त संकलित होणार आहे.

महावीर इंटरनॅशनल वीर-वीरा शिरुर केंद्राचे पदग्रहण


नगर । प्रतिनिधी -
समाजातील दुर्बल घटकांची विविध मार्गाने सेवाभावी कार्य करणार्‍या महावीर इंटरनॅशनल या संस्थेने 45 वर्षांत देश-विदेशात लौकिक प्राप्त केला व आज भगवान महावीर स्वामीजींच्या जन्मदिनी शिरुर (जि. पुणे) येथे सुनील बाफना व समीक्षा बाफना यांच्या प्रेरणेने वीर आणि वीरा केंद्राचे पदग्रहण होत आहे. त्यानिमित्त महावीरांना अपेक्षित असलेले सेवाभावी कार्य म्हणून या सदस्यांनी पुणे येथील नामांकित 15 डॉक्टर व हार्डीकर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने 400 रुग्णांची तपासणी करुन पुण्य कमावले, हे अभिनंदनीय आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेशचंद्र बाफना यांनी केले.
बाफना यांच्या हस्ते वीर-वीरा सदस्यांचा शपथविधी पार पडला, यावेळी ते बोलत होते. झोन चेअरमन गौतमलाल बरमेचा व वीरा माजी अध्यक्षा बरमेचा यांनी वीरांना शपथ दिली. नवकार मंत्र, महावीरांची प्रार्थनानंतर सर्व ज्ञात-अज्ञात मृतात्म्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.  सेक्रेटरी सुदर्शन दुगड यांनी उपस्थितांचे स्वागत करुन महावीर इंटरनॅशनल या संस्थेच्या कार्याची माहिती दिली.
नगरच्या वीरा केंद्र अध्यक्षा उज्ज्वला बोथरा यांनी महावीर चिन्हाने वीर-वीरांना सन्मानित करुन शुभेच्छा दिल्या. शिरुर केंद्राचे अध्यक्ष सुनील बाफना यांनी महाआरोग्य शिबिरास सहकार्य करणार्‍या डॉ. हर्डीकर व त्यांच्या सदस्यांचे आभार मानले व 400 हून अधिक रुग्ण आप्तांनी दिलेल्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले. वीरा केंद्राच्या नूतन अध्यक्षा समीक्षा बाफना व सचिव सपना दुगड यांनी शिरुर शहरात महिला व युवतींसाठी भरीव सामाजिक कार्य करण्याचा संकल्प केला. उपाध्यक्ष अभय चोरडीया यांनी शिरुर केंद्राच्या नियोजित उपक्रमांचा आढावा सादर केला व शिरुरच्या समाजबांधवांचे सर्व उपक्रमांना सहकार्य लाभेल, असा विश्वास व्यक्त केला.
सुप्रिका दुगड हिने या उपक्रमास उत्कृष्ट सहकार्य केल्याबद्दल संघपति शांतीलालजी कोठारी यांनी तिचा सत्कार केला. लवकरच आपण शिरुर शहरात युवती केंद्र सुरु करु असे सुप्रिका हिने जाहीर केले व त्यास उपस्थित सर्व युवतींनी प्रतिसाद दिला. संघपति शांतीलाल कोठारी यांनी आपल्या भाषणात महावीर इंटरनॅशनलचे कार्याबद्दल समाधान व्यक्त केले व या केंद्राद्वारे शिरुर येथे भरीव कार्य होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमास नगर केंद्राचे माजी अध्यक्ष महेंद्र लोढा, उपाध्यक्ष रमेशचंद्र बाफना, झोन चेअरमन गौतमलाल बरमेचा, संचालक मनोज शेटिया, माणकचंद कटारिया, राजेंद्र बोथरा, सुवालाल ललवाणी, श्रेणिक नहार व वीरा केंद्राच्या उपाध्यक्षा निर्मल बाफना, माजी अध्यक्षा सरला बरमेचा, अध्यक्षा उज्ज्वला बोथरा, वैशाली शेटिया, मंजुषा ललवाणी, सजनबाई कटारिया व सचिव सुरेखा संचेती, शोभा लोढा आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीकांतीलाल बाफना, चोरडिया, दुगड आदी परिवार व शिरुरचे बंधू-भगिनी उपस्थित होते. वैभव गादिया यांनी आभार मानले.

मोफत व्यवसाय प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ


नगर । प्रतिनिधी -
वर्ल्ड साळी फाउंडेशनच्या वतीने नगरमध्ये साळी समाजातील सर्व महिला, मुली व मुलांसाठी  मोफत व्यावसायिक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या कॉम्प्युटर, शिवणकाम, ब्युटीपार्लर व फोटोग्राफीच्या मोफत व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे  उद्घाटन स्पार्कल इन्स्टिट्यूट, स्टेट बँकेच्या जवळ, दिल्लीगेट, अहमदनगर येथे राज्य स्वकुळसाळी समाज महिला मंडळाच्या उपाध्यक्षा  सौ. मृणाल कनोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  सुषमा साळी, मंगला मानकर, प्रशिक्षक सौ. अनुजा कांबळे, महेश कांबळे, सुनील साळी, सौ.सविता हावरे, महेश ढोरजे यांच्यासह फाउंडेशनचे संपर्क प्रमुख, प्रशिक्षणार्थी, समाजबांधव उपस्थित होते.
मृणाल कनोरे म्हणाल्या की, मोफत प्रशिक्षण देणे हे पुण्याचे काम आहे. पूर्वी गुरुकुल पद्धतीत मोफत प्रशिक्षण मिळत होते, आता सध्याचा जमान्यात मोफत देणे अवघड आहे तरी वर्ल्ड साळी फाउंडेशनने नोकरी न करता समाजातील युवक-युवतींनी स्वतःचा व्यवसाय करावा या हेतूने आयोजलेला उपक्रम कौतुकास्पद आहे.
या शिबिरात वय वर्षे 15 च्या वरील कोणीही समाजबांधव सहभागी होऊ शकतो. असे संपर्कप्रमुख महेश कांबळे यांनी सांगितले. प्रशिक्षण शिबिर पूर्ण  करणार्‍यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन, शासकीय/निमशासकीय स्तरावरील कर्ज योजना यांच्या माहितीद्वारे मदत करण्यात येईल.
तसेच असहाय, गरीब, गरजू महिला, मुली व मुलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रचार समाप्तीनंतर राजकीय पक्ष व उमेदवारांना जाहीर प्रचारास मनाई


नगर । प्रतिनिधी -
लोकसभा मतदारसंघासाठी उद्या (मंगळवार) मतदान होणार असून त्यासाठीचा जाहीर प्रचार दिनांक 21 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता संपला आहे. मतदानापूर्वी 48 तास आधी कोणत्याही राजकीय पक्ष आणि उमेदवारांस जाहीर प्रचारास तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातील प्रचारास बंदी करण्यात आली आहे. चलचित्र, बल्क एसएमएस,  दूरचित्रवाणी किंवा अन्य तत्सम साधनांच्या साह्याने निवडणूक विषयक कोणतीही बाब प्रदर्शित करता येणार नाही.  याशिवाय, वृत्तपत्रात दिनांक 22 व 23 एप्रिल रोजी द्यावयाच्या जाहिराती माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणित करुन घ्याव्या लागणार आहेत. राजकीय पक्ष अथवा उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.
दिनांक 10 मार्च रोजी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर तात्काळ आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरु करण्यात आली. अर्ज माघारीच्या दिवसानंतर अहमदनगर मतदारसंघात एकूण 19 उमेदवार रिंगणात राहिले. त्यानंतर खर्‍या अर्थाने उमेदवारांच्या जाहीर प्रचारास सुरुवात झाली. जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या वतीने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी व्हावी यासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली. त्यांच्या मार्फत उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रचाराकडे प्रशासन लक्ष ठेवून होते. दिनांक 21 एप्रिल रोजी सायंकाळी प्रचार संपल्यानंतर कोणत्याही उमेदवार अथवा राजकीय पक्षांनी जाहीर प्रचार अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातील प्रचारास बंदी करण्यात आली आहे. मात्र, उमेदवार वैयक्तिकरित्या प्रचार करु शकतील. परंतु पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मज्जाव असेल.
 मतदानाच्या दिवशी राजकीय पक्ष आणि उमेदवारांना मतदान केंद्रापासून 200 मीटर दूर पोलींग बूथ लावावा लागणार आहे. याशिवाय, याठिकाणी त्यांना केवळ एक टेबल आणि दोन खुर्च्या ठेवता येणार आहेत.  निवडणूक आयोगाच्या या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी निवडणूक यंत्रणेकडून करण्यात येणार आहे.

कराटे संस्थेच्यावतीने विविध बेल्ट प्रदान


नगर । प्रतिनिधी -
नुकत्याच परिक्षा संपून सुट्या सुरु झाल्या आहेत. परंतु अनेक मुले ही मोबाईल, व्हीडिओ गेम, कॉम्प्युटरमध्ये अडकून पडलेले दिसत आहेत. यामुळे मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे, याचा पालकांनी विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी किमान सुट्टीत मुलांना मैदानी खेळाकडे वळविले पाहिजे. कराटे खेळामुळे आत्मसंरक्षणाचे धडे मिळून आरोग्यही चांगले राहू शकते. आज विविध बेल्टमध्ये यशस्वी झालेल्या खेळाडूंनी कठोर मेहनत घेऊन हे यश संपादन केले आहे. त्यामुळे पुढील काळात त्यांच्या आणखी विकास होईल, असे प्रतिपादन वर्ल्ड फुनाकोशि शोतोकान कराटे संस्थेचे मुख्य प्रशिक्षक हारुण शेख यांनी केले.
वर्ल्ड फुनाकोशि शोतोकान कराटे संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध बेल्ट परिक्षेतील विद्यार्थी बेल्ट प्रदान करण्यात आले.  याप्रसंगी मुख्य प्रशिक्षक हारुण शेख, प्रशिक्षक रमजान शेख, तन्वीर खान, अब्दुल शेख, ईशिता झंवर, मयुर माने, सोनल मिश्रा, प्रबोध बन, यश तासतोडे, बिलाल शेख, ईशान होसिंग, राहुल वाघ आदि उपस्थित होते.
संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध बेल्ट परिक्षेतील यशस्वी खेळाडू पुढीलप्रमाणे : यल्लो बेल्ट - आर्यन गव्हाळे, ओमकार कवडे, स्पर्श भंडारी, प्रांजल पारधी, सई हरबा, श्लोक रानमळकर, अहम नहार, त्रिजल मेघानी, अनन्या झरकर, अमेय झरकर. ऑरेंज बेल्ट - शिवक्रांती विश्वकर्मा, स्वरा मुनोत, विधी गुंदेचा, प्रगती बागल, माही कवळे. ग्रीन बेल्ट - कृष्णा कोरडे, तनवी वारुळे, विराज होनराव, हर्षद खराडे, अभिनव काकडे, यशश्री कोरडे, शांभवी होनराव, श्रीजन विश्वकर्मा, विराज कांबळे, मुग्धा जेठे, आराध्या रोहमी, आर्यन गोरे, वैभवी भांबरे.
ब्लू बेल्ट - वैष्णवी खराडे, चिराग शिंगवी, साची पवार, उदय त्र्यंबके, आदित्य केदारी, अभि बंग, अदित्य साठे, सलज मिश्रा, आदित्य दरेकर, ओमकार माने. पर्पल बेल्ट - अवधूत बुरगुले, सिद्धार्थ थोरे, वैष्णवी भांबरे. ब्राऊन बेल्ट - करिष्मा क्षत्रिय, प्रांजल खाडे, तुळसीदास सोंडगे, प्रज्वल खाडे, ओमराज कदम, मयंक दिवटे, विशाल थोरे, समर्थ बोरुडे, वैष्णवी आबोलू, प्रीती जेठे. गोल्डन ब्राऊन बेल्ट - पुष्कर कापकर, यश कुलथे. ब्लॅक बेल्ट - आश्विन चंगेडे, ओमकार शिंदे, प्रतिक व्यवहारे.वरील सर्व खेळाडूंना बेल्ट प्रदान करण्यात आले. सर्व यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

श्री परशुराम प्रतिष्ठानच्यावतीने भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचे आयोजन


नगर । प्रतिनिधी -
येथील श्री परशुराम प्रतिष्ठान च्या वतीने 3 मे ते 7 मे या कालावधीत भगवान श्री परशुराम जन्मोत्सव व अक्षय्य तृतीयेनिमित्ताने भव्य श्री परशुराम याग सावेडीतील श्री रेणुकामाता मंदिर सुयोग गृहनिर्माण सोसायटी, प्रोफेसर कॉलोनी चौक, सावेडी अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या पत्रिकेचे माळीवाडा येथील नगरचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात, पुजारी महंत संगमनाथ महाराज यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी परशुराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय देशपांडे, स्वप्नील देशमुख, सौ. मंजिरी देशपांडे, सौ.पद्मश्री देशपांडे,गजानन कुलकर्णी, सागर भोपे, गणेश भोपे, भार्गव देशपांडे, ढाकणे आदी उपस्थित होते.
शुक्रवार दि.3 मे रोजी सायंकाळी 6 वाजता श्री क्षेत्र माहूर येथील मातृज्योत व श्रीक्षेत्र जानापाव कुटी, मध्यप्रदेश येथील भगवान श्री परशुरामाच्या पादुका तसेच उत्सव मूर्तीचे आगमन व महाआरती होणार आहे.
शनिवार दि.4 मे रोजी सायंकाळी 5 वाजता भक्तीसंध्या कार्यक्रम होणार आहे. रविवार दिनांक 5 मे ते मंगळवार दिनांक 7 मे या कालावधीत दररोज सकाळी 6 वाजता भगवान श्री परशुराम याग होणार आहे. रविवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिर व सायंकाळी 5 वाजता रांगोळी स्पर्धा होणार आहेत. सोमवार दिनांक 6 मे रोजी सकाळी 9 वाजता चित्रकला स्पर्धा, सायंकाळी 5 वाजता कथाकथन व वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत.
मंगळवार दिनांक 7 मे रोजी दुपारी 1 वाजता  महाप्रसाद व सायंकाळी 5 वाजता रेणुका माता मंदिर ते भिस्तबाग चौक पाईपलाईन रोड येथे भगवान श्री परशुराम यांच्या पादुकांची भव्य शोभायात्रा होणार आहे. सायंकाळी 7 वाजता  भागवताचार्य ह.भ.प. वा. ना. उत्पात (श्रीक्षेत्र पंढरपूर) यांचे व्याख्यान होणार आहे. रात्री 8 वाजता बक्षीस वितरण व 8.30 वाजता भगवान श्री परशुरामाची महाआरती होणार आहे.
खुल्या रांगोळी स्पर्धेसाठी साचेमुक्त रांगोळी, मुक्तहस्त, चित्र स्वरूप व ठिबक्यांची रांगोळी हा विषय ठेवण्यात आला आहे. पहिले ते चौथी या गटातील कथाकथन स्पर्धेसाठी भगवान श्री परशुराम हा विषय ठेवण्यात आला आहे. 5वी ते 7वी या गटातील विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेसाठी अक्षय्यतृतीया, भारत माझा देश आहे. 8वी ते 10वी या गटासाठी पाणीटंचाई व उपाय योजना, व्यसन एक समस्या, माझ्या स्वप्नातील भारत.11 ते टी. वाय. या गटासाठी आधुनिक भारतातील युवकांपुढील आव्हाने, एकविसाव्या शतकातील भारतीय युवकांच्या जबाबदार्‍या हे विषय ठेवण्यात आले आहे. 5 ते 7 या गटातील चित्रकला स्पर्धेसाठी संकल्पचित्र, तर 8 वी ते 10 वी या गटासाठी स्मरणचित्र हे विषय ठेवण्यात आले आहेत.
सर्व स्पर्धा रेणुका माता मंदिर सुयोग गृहनिर्माण सोसायटी, प्रोफेसर चौक, सावेडी या ठिकाणी होणार आहेत. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी संयोजन समिती सदस्यांशी संपर्क साधावा असे आवाहन श्री परशुराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय देशपांडे व सदस्यांनी केले आहे.

Saturday, 20 April 2019

उसाच्या एफआरपीप्रमाणे कांद्याबाबतही शाश्वत धोरणासाठी पाठपुरावा करणार


पारनेर । प्रतिनिधी -
साखर उद्योगाला संजीवनी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकरीहिताचे निर्णय घेत दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दिलेल्या एफआरपीच्या संरक्षणाप्रमाणेच कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या बाबतीतही सरकारने शाश्वत धोरण घ्यावे, यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, अळकुटी, जवळे, वाडेगव्हाण येथे महायुतीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. डॉ. विखे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकर्‍यांच्या हिताचे महत्वपूर्ण निर्णय घेतले. या निर्णयांचा लाभ आज देशातील शेतकर्‍यांना होत आहे. यावर्षी 50 हजार मेट्रीक टन कांदा ‘नाफेड’ने खरेदी करुन शेतकर्‍यांना दिलासा दिला. पण कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या संदर्भात केंद्र सरकारने शाश्वत धोरण घ्यावे, यासाठी लोकसभेत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभेची ही निवडणूक आपल्या मतदारसंघात विचारांवर आधारित आहे. शेतकरी, पाणी, रोजगार या प्रश्नांवर मी माझी भूमिका प्रचारात सुरुवातीपासून मांडली. यासाठी विचारांचा वारसा लागतो, प्रश्नांवर बोलण्याची हिंमत लागते. समोरचे उमेदवार केवळ व्यक्तिद्वेषातून प्रचार करुन वेळ मारून नेत आहेत. त्यांच्याकडे सांगण्यासाठी कोणतेही काम नाही. या मतदारसंघासाठी ते काय करणार हेही ते सांगू शकत नाहीत. प्रश्नांसाठी त्यांना जनतेने संधी दिली होती, पण जनतेचे कोणतेही प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी ते बोलूही शकले नाहीत, असा टोला विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांचे नाव न घेता लगावला.
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष आमदार विजयराव औटी, पंचायत समिती सभापती राहुल झावरे, दिनेश बाबर, डॉ. भास्कर शिरोळे, सचिन वराळ, काशिनाथ दाते, रामदास रोहकले, विश्वनाथ कोरडे, सुवर्णा वाळुंज आदी उपस्थित होते.

काटवन खंडोबा परिसरात टँकरच्या पाण्यासाठी झुंबड


नगर । प्रतिनिधी -
शहरालगत असलेल्या सीना नदी पलीकडील काटवन खंडोबा, गाझीनगर भागात 3 महिन्यांपासून नळाद्वारे पाणी येत नसल्याने नागरिकांना पाण्याचा टँकर आधार ठरत आहे. नळाला पाणी येत नसल्याने टँकर येताच पाणी भरण्यासाठी महिलांची झुंबड उडत आहे. चार ते पाच दिवसांआड पाण्याचे टँकर येत असून, नागरिकांना भीषण पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
गाझीनगर येथे दोन्ही बाजूंनी पाईपलाईन टाकण्यात आलेली असून, काही मोजके नळ सोडले तर मुख्य रस्त्याच्या आतील भागात असलेल्या नागरिकांच्या नळाला पूर्ण दाबाने पाणीच येत नाही.
हा त्रास 3 महिन्यांपासून नागरिक सहन करीत असून, ऐन उन्हाळ्यात पाण्याच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. यामुळे पाणीप्रश्नावरुन नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहे.

बैसाखीनिमित्त आयोजित पाककला, हेअर स्टाईल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद


नगर । प्रतिनिधी -
शीख-पंजाबी समाजाच्या वतीने शहरात बैसाखी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवांतर्गत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, नुकतीच महिलांसाठी पाककला व हेअर स्टाईल स्पर्धा पार पडली. त्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिरात ही पाककला व हेअर स्टाईल स्पर्धा पार पडली. स्पर्धक महिलांनी विविध स्वादिष्ट खाद्यपदार्थांची मेजवाणी उपलब्ध करुन दिली होती. तर आकर्षक केशरचनेचे सादरीकरण केले. बैसाखी उत्सवानिमित्त शनिवार दि.20 एप्रिल रोजी शीख-पंजाबी समाजाच्या वतीने हॉटेल संजोग येथे वीरसा पंजाबीया दा (बैसाखी मेला) हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये पंजाबी गीतांवर आर्केस्ट्रा, पंजाबी ढोल, धाडसी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण आदी विविध कार्यक्रमांसह पंजाबी, शीख समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडणार आहे.
या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चित्रकला, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, पंजाबी स्टोरी, मॉडेल मेकिंग, रॅम्प वॉक आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी भाई दयासिंगजी गोविंदपुरा, भाई कुंदनलालजी गुरुद्वारा, श्रीहर श्रीनाथ दर्गा, पंजाबी सेवा समिती, जी.एन.डी ग्रुप, गुरु गोबिंदसिंग पतसंस्था यांचे सहकार्य लाभत आहे. या कार्यक्रमात शीख, पंजाबी समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सिंधी समाजातर्फे नाशिक येथे वधूवर परिचय संमेलन


नगर । प्रतिनिधी -
नाशिक सिंधी सोशल ग्रुपच्या वतीने दि. 5 मे रोजी सकाळी 9 ते 5 यावेळेत इच्छामणी लॉन, उपनगर नाशिक येथे सिंधी समाजाचे वधू-वर परिचय संमेलन होणार आहे. होणार आहे. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख दि. 1 मे आहे, अशी माहिती हरीश कटारिया, दीपक तोलाणी, सुनील शर्मा, किशोर कंत्रोड यांनी दिली. अधिक माहीतीसाठी नाशिक सिंधी सोशल ग्रुप, गुगल प्ले स्टोअसवरून अ‍ॅप सिंधी बंधन डाऊनलोड करणे, तसेच दीपक तोलानी (मो. 9822266372), विवेक - 8793906933, अनिकेत - 9320791610, सनी - 9689236476, जय - 9822991261. किशोर कंत्रोड मधुरमिलन मॅरेज ब्युरो (सोशल सर्व्हिस, किशोर प्रोव्हिजन स्टोअर्स इंदिरा कॉलनी, तारकपूर, अहमदनगर) मोबा. 8999812408, 9226783101, 0241-2428224 यांच्याशी संपर्क साधावा. मेळाव्याचा समाजबांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पंडित सुनील शर्मा, हरीश कटारिया, दीपक तोलानी, किशोर कंत्रोड व सर्व आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

दैवशाला गर्जे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड


नगर । प्रतिनिधी -
2016 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेच्या परीक्षेतून नागलवाडी, ता. शेवगांव येथील सौ.दैवशाला गर्जे-आंधळे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी  निवड झाली. गर्जे यांनी लग्नानंतर संसार सांभाळून शिक्षण करत इच्छाशक्ती मनाशी बाळगून हे यश मिळविले.  पती हर्षद रावसाहेब आंधळे यांच्या खांद्याला खांदा लावून संसार करतानाच परिस्थितीचा सामना करत प्रयत्नवादी विचारातून पुढे वाटचाल केली. दैवशाला यांनी नागलवाडी गावच्या पहिल्या महिला पोलिस अधिकारी होण्याचा मान मिळवले आहे. त्यांचे माध्यमिक शिक्षण हे वनवेवाडी येथे केले. पुढील शिक्षण हे शेवगाव, पाथर्डी येथे केले. या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

जागरुक नागरिक मंचतर्फे नगरच्या प्रश्नांवर महाचर्चा


नगर । प्रतिनिधी -
नगर शहर व जिल्हा गेल्या 30-40 वर्षांपासून आहे, त्या स्थितीत आहे. रस्ते, वीज, पाणी, खड्डे, बाह्यवळण रस्ता, एमआयडीसी, बेरोजगारी व उड्डाणपूल, अतिक्रमण अशा समस्यांनी ग्रासलेला आहे. अशा परिस्थितीत होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी जागरुक नागरिक मंचने मतदार जागृती अभियान व मतदारांची उदासीनता हटवून 100 टक्के मतदान घडून आणण्यासाठी महार्चेचे आयोजन शहरातील वाडिया पार्क येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर केले होते. या महाचर्चेत आपली निवडणूक लढविण्याबाबतची भूमिका मांडण्यासाठी लोकसभा निवडणुकीसाठी उभे असलेल्या सर्व 19 उमेदवारांना पाचारण करण्यात आले होते. मात्र केवळ तीन उमेदवारांनीच या महाचर्चेस उपस्थितीत लावली. उमेदवारांबरोबरच विविध क्षेत्रातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागरुक नागरिक मंचचे संस्थापक अध्यक्ष सुहास मुळे यांच्या संकल्पनेतून ‘ऐतिहासिक नगर-भौगोलिक निवडणूक व संभ्रमात नागरिक’ जनजागृतीचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
या महाचर्चेत लोकसभेचे अपक्ष उमेदवार साईनाथ घोरपडे, अ‍ॅड.कमल सावंत व फारुक शेख या तीन उमेदवारांनी आपली भूमिका मांडली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्यावतीने अरविंद शिंदे यांनी भूमिका मांडली. त्याचबरोबरच सुरेखा सांगळे यांनी एमआयडीसीचा प्रश्न, नलिनी गायकवाड यांनी बाह्यवळण व सीना नदीचा प्रश्न, शारदा होशिंग यांनी स्वच्छतेचा प्रश्न, निर्मला भंडारी यांनी आय.टी.पार्कचा प्रश्न, विलास पेद्राम यांनी पहाटे सुटणार्‍या पाण्याचा प्रश्न, राजू शेख यांनी वाडिया पार्कमधील गाळ्यांचा प्रश्न या महाचर्चेत उपस्थित करुन थोडक्यात मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव कैलास दळवी यांनी केले तर आभार सुनील कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळासाहेब भुजबळ, सुनील कुलकर्णी, जयकुमार मुनोत, अभय गुंदेचा, विष्णू सामल, अमृत बोरा, अनमान शेख, पुरुषोत्तम गारडे, योगेश गणगले, बी.यू.कुलकर्णी, अमेय मुळे आदींनी परिश्रम घेतले.

डोंगरगणच्या निसर्गरम्य परिसरातील वन्यजीव, पक्ष्यांसाठी सरसावला महावीर चषक परिवार


नगर । प्रतिनिधी -
मागील वर्षी वरूणराजाने केलेली अवकृपा व आताच्या उन्हाळ्यात सूर्यनारायणाचा होत असलेला प्रकोप यामुळे प्रत्येकाची लाहीलाही होत आहे. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत केव्हाच आटले असून नगरजवळील हॅपी व्हॅली अशी ओळख असलेला गर्भगिरीच्या डोंगररांगेतील डोंगरगणचा परिसरही पाण्याअभावी मलूल झाला आहे. येथील पक्ष्यांचा किलबिलाट, डोंगररांगातून खळखळ वाहणारे पाणी गायब झाले आहे. समस्त प्राणीमात्रांप्रती करूणेचा संदेश देणार्‍या भगवान महावीर स्वामींच्या जयंतीदिनी मुक्या प्राण्यांवर दया करा, अहिंसा परमो धर्म:, जगा व जगू द्या या तत्वांना अनुसरून नगरमधील महावीर चषक परिवाराने थेट डोंगरगण गाठून या भागातील वन्यजीव, पक्ष्यांसाठी तब्बल 25 हजार लिटर पाणी टँकरने सोडले. या उपक्रमातून सर्वांनी प्रत्यक्ष कृती करून महावीरांचा संदेश आचरणात आणत महावीर जयंती साजरी केली. कडक उन्हात अवतरलेल्या या जलधारांनी वन्यजीवांसह पक्षी यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले. मुक्या जीवांचा किलबिलाट श्रवण करीत सर्वांनी डोंगरदर्‍यात भटकंती केली आणि गप्पाष्टके रंगवत भेळभत्त्याचा आस्वाद घेतला.
कडक उन्हाळा व दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. असे असले तरी निसर्गात मुक्तपणे विहार करणारे वन्यजीव, पक्षी यांचीही चारापाण्याची काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषत: नगरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डोंगरगण परिसरालाही यंदा दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. ब्रिटीशकाळात उन्हाळ्यात ब्रिटीश अधिकारी आवर्जून या निसर्गरम्य परिसरात जात असत. आता कमी पर्जन्यमान तसेच अन्य कारणांनी या निसर्गरम्य परिसरालाही उतरती कळा लागल्याने या डोंगरदर्‍यातील वृक्षवेली कोमजल्या आहेत. नैसर्गिक पाणवठे केव्हाच आटले आहेत. त्यामुळे वन्यजीव, पक्षी यांचीही तगमग होत आहे. त्यामुळेच महावीर चषक परिवाराने नगरहून टँकरने पाणी नेवून ते या भागातील नैसर्गिक पाणवठ्यात सोडण्यास सुरुवात केली आहे.
यावेळी महावीर चषक परिवाराचे संजय चोपडा, राजेंद्र ताथेड, प्रीतम पोखरणा, प्रफुल्ल मुथा, डॉ.सचिन बोरा, प्रवीण शिंगवी, सी.ए.आनंद गांधी आदी उपस्थित होते. निसर्ग मित्र मंडळाचे भैरवनाथ वाकळे, राजेंद्र गांधी व त्यांचे समविचारी सहकारी गेल्या अनेक दिवसांपासून या भागात टँकरने पाणी सोडून वन्यजीवांना मायेचा ओलावा देत आहेत. त्यांनी तब्बल 10 टँकर पाणी या परिसरात सोडले आहे. ऋषीकेश लांडे, विद्यासागर पेटकर, संजय दळवी यांनीही या उपक्रमात सहभाग घेत पक्ष्यांची, वन्यजीवांची माहिती देत आपल्या कॅमेर्‍यात या सजीवांचे बागडणे कैद केले. चिमणी, निलीमा, किंगफिशर, होले, नर्तक यांच्यासह दुर्मिळ समजल्या जाणार्‍या शृंगी घुबडाचेही दर्शन यावेळी सर्वांना झाले. आदर्श व्यापारी मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र ताथेड व प्रितम पोखरणा यांनी यावेळी उन्हाळा संपेर्यंत या परिसरात महावीर चषक परिवार वेळोवेळी टँकरव्दारे पाणी सोडून वन्यजीव, पक्ष्यांची काळजी घेईल, असे सांगितले.
नगरकरांसाठी डोंगरगणचा परिसर पावसाळ्यातील निसर्ग पर्यटनाचे हक्काचे केंद्र आहे. उन्हाळ्यात पाण्याअभावी या परिसरातील हिरवळ गायब होत आहे. त्यामुळे मुक्तपणे बागडणारे पक्षीही कोमजले आहेत. त्यांना त्यांच्या नैसर्गिक पाणवठ्यावर पाणी उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम परिसरात नवचैतन्य आणणारा ठरला आहे. सर्वांनी अतिशय उत्साहात डोंगरगण परिसरात भटकंती करीत पक्ष्यांच्या किलबिलटाच्या मधुरसंगीताचा आनंद लुटला. भेळभत्त्याचा आस्वाद घेत मनमोकळ्या गप्पांचाही आनंद घेतला.

जिद्द व चिकाटी असेल तर यश नक्की मिळते ः पारगांवकर


नगर । प्रतिनिधी -
जिद्द, चिकाटी, सराव व प्रयत्नात सातत्य असेल तर तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षेत यश नक्की मिळेल, असे प्रतिपादन लार्सन अँड टुर्बो कंपनीचे जनरल मॅनेजर अरविंद पारगावकर यांनी केले.
मंथन वेलफेअर फौंडेशन व साप्ताहिक ज्ञानवंतच्या वतीने माऊली संकुल सभागृहात आयोजित मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यूपीएससी रँकर आयपीएस जैब शेख, उपजिल्हाधिकारी डॉ. दयानंद जगताप, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय साळवे, कार्डिओलॉजिस्ट  डॉ. संदीप गाडे, सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजा देवकर, ‘तुला पाहते रे’ फेम अभिनेते मोहिनीराज गटणे, सुप्रसिद्ध कवी प्रा. प्रशांत मोरे आदी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पारगावकर म्हणाले, मंथन वेलफेअर फौंडेशनच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी व भविष्यातील विविध क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी मार्गदर्शन करीत आहे. ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे.
जैब शेख म्हणाले की, पालकांनी आता विद्यार्थ्यांना ससा आणि कासवाची जुनी गोष्ट सांगणे बंद केले पाहिजे. कारण सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना सतत सतर्क व कार्यरत राहणे गरजेचे आहे.
डॉ. संदीप गाडे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्यातील न्यूनगंड काढून टाकावा. व मोठ्या हिंमतीने स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे. अभिनेत्री तेजा देवकर म्हणाल्या की, प्रत्येक मुलांमध्ये काही सुप्त गुण असतात. पालकांनी ते हेरले पाहिजेत व त्या गुणांना वाव दिला पाहिजे. प्रत्येक मुलाला परीक्षेत चांगलेच गुण मिळतील व प्रत्येक जण डॉक्टर, इंजिनिअर होणार नाहीत. मात्र मुलांना ज्या क्षेत्रात गती आहे त्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. पालकांनी मुलांचे बालपण जपावे, त्यांना खेळू द्यावे, बागडू द्यावे, मित्र-मैत्रिणीमध्ये मिसळू द्यावे. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून अभ्यासही करून घ्यावा.
यावेळी प्रशांत मोरे यांनी ‘हंबरुनी वासराला’, ’मला शाळेला पाठवायची माझी माय’, ’ऐका ऐका दोस्तांनो मायबापाची कहाणी’ अशा लोकप्रिय कविता सादर केल्या. अभिनेते मोहिनीराज गटणे म्हणाले की, मंथन प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच एमपीएससी, यूपीएससी परीक्षेची रंगीत तालीम आहे. मंथन वेलफेअर फौंडेशनने या परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील कानाकोपर्‍यातील विद्वत्तेला वाव दिला. तुम्हाला मिळणारी पारितोषिके म्हणजे तुमच्या मेहनतीचे फळ आहे.
यावेळी मंथन वेलफेअर फौंडेशनच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. सचिन नरसाळे यांनी प्रास्ताविक केले. भगवान राऊत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अमोल बागुल यांनी सूत्रसंचालन केले. किशोर गोरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील 250 हून अधिक विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते.

सप्तसूरच्या गीतरामायणात श्रोते मंत्रमुग्ध


नगर । प्रतिनिधी -
सप्तसूर फाऊंडेशनच्या वतीने गदिमा व बाबूजी उर्फ सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून माऊली सभागृहात गीतरामायणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सप्तसुरांनी सजलेल्या गीतरामायणातील निवडक गीते फाऊंडेशनच्या गुणी कलावंतांनी सादर केली. उपस्थित रसिकश्रोते या गीतांच्या भक्तीरसात न्हाऊन निघाले. सर्वांसाठी मोफत असलेल्या या कार्यक्रमास नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सप्तसूर फाऊंडेशनचे कलाकार डॉ.विलास जोशी, डॉ.योगिनी वाळिंबे, रेखा जोशी, डॉ.स्मिता केतकर, डॉ.शिरीष कुलकर्णी, डॉ.रोहिणी काळे, डॉ.अविनाश वारे, डॉ.बाळासाहेब देवकर आणि डॉ.सचिन पानपाटील यांनी गीतरामायणातील निवडक 20 अजरामर गीते सादर केली. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.
डॉ.राजीव सूर्यवंशी यांनी आपल्या शैलीत रामकथा मांडून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. पाहुण्यांचे स्वागत फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.विलास जोशी यांनी केले. डॉ.संगीता कुलकर्णी यांनी सप्तसूरची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.अभिजीत पाठक, डॉ.अजित काळे, डॉ.प्राची पाटील, ज्योती दीपक, मनीषा सूर्यवंशी, डॉ.पोळ यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास डॉ.फाटके, मॅक्स केअर हॉस्पिटल, डॉ.विजय पाटील, डॉ.सुंदर गोरे, डॉ.धनंजय वारे, मिलन गंधे, शिंगवी ज्वेलर्स, जोपासू प्रोडक्टस यांचे सहकार्य लाभले.

Friday, 19 April 2019

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी 10 वर्षे सक्तमजुरी


नगर । प्रतिनिधी -
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरुन नगर जिल्हा सत्र न्यायालयात दाखल खटल्यात आरोपी राजप्रसाद मामाप्रसाद शर्मा (37, खंडोबा वस्ती, जामखेड) याला न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरी व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडित मुलीच्या वडिलांना देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
शर्मा हा तेरावर्षीय पीडित मुलीच्या घरी 20 जानेवारी 2018 रोजी आला व मुलीस फिरावयास घेऊन जातो, असे सांगून सौताडा (ता. पाटोदा, बीड) येथे घेऊन आला, तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. कोणाला सांगितल्यास मारुन टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर शर्मा 30 जानेवारीला मुलीच्या घरी गेला, पत्नी आजारी आहे, तिला दवाखान्यात घेऊन जायचे आहे, असे सांगून मुलीला घेऊन गेला व तिच्यावर पुन्हा अत्याचार केले. त्यानंतर पीडित मुलीने अत्याचाराची माहिती वडिलांना सांगितली. मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एन. एस. सहारे यांनी केला व शर्मा यास अटक करून  न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी या खटल्याचा निकाल गुरुवारी दिला. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील अनिल सरोदे यांनी काम पाहिले. खटल्यात एकूण तीन साक्षीदार तपासण्यात आले. बालकांचा लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोस्को) 2012 चे कलम 5 व भादंविक 376 अन्वये दोषी धरुन शर्माला 10 वर्षे सक्तमजुरी व 20 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कैद तसेच भादंविक 506 अन्वये 1 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने कैद, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

प्राचार्य अर्जुनराव सदाफुले यांचे निधन


नगर । प्रतिनिधी -
नगर येथील बहुजन शिक्षण संघाचे विश्वस्त व सम्बोधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, समाज संघटक अर्जुनराव सदाफुले सर यांचे शुक्रवारी (दि. 19) रोजी निधन झाले. त्यांच्यावर नालेगाव अमरधाम येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
सदाफुले सर हे आंबेडकरी चळवळीतील एक अग्रणी कार्यकर्ते होते. विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग होता. गोरगरिब विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाच्या कार्यात ते नेहमीच अग्रेसर होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

पॅन कार्ड क्लब बाधित गुंतवणूकदार व विपणन प्रतिनिधी आ. जगतापांच्या पाठीशी


नगर । प्रतिनिधी -
राष्ट्रशक्ती संघटना पुणे आणि राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को-ऑर्डिनेशन कमिटी आयोजित पॅन कार्ड क्लब बाधित गुंतवणूकदार व विपणन प्रतिनिधींचा महामेळावा नुकताच नगर शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात घेण्यात आला. मेळाव्यात गुंतवणूकदार व विपणन प्रतिनिधींनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा जाहीर केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, जिल्हा उपाध्यक्ष सीताराम काकडे, राष्ट्रशक्ती इन्वेस्टर को-ऑर्डिनेशन कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दारवटकर, सचिव शहाजी अडसूळ, वेल्फेअर फोरमचे अध्यक्ष नंदकुमार गावडे, सचिव मुकुंदराव मोरे, आयोजक देवराम कार्ले व पॅन कार्ड क्लबचे गुंतवणूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सीताराम काकडे म्हणाले, या सरकारने रोजगार निर्माण तर केला नाही उलट चांगल्या सुरू असणार्‍या संस्था बंद करून बेरोजगारी वाढवली आहे. शेतकरी देशोधडीला लावला आहे. युवक दिशाहीन केला आहे. जाती-धर्माच्या नावावर राजकारण करून अराजकता माजवली आहे. लोकशाहीला या सरकारचा मोठा धोका निर्माण झाला आहे. पॅन कार्ड  गुंतवणूकदारांमध्ये एकूण 55 लाख लोकांची फसवणूक झाली आहे. त्या 55 लाख लोकांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पार्टी ठामपणे उभी राहणार असून त्यांना न्याय देण्याचा काम पक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. बेरोजगारीचा मोठा प्रश्न असल्यामुळे यात अनेक तरुणवर्ग गुंतला आहे. समाजानेही त्यांच्याकडे एक समंजस भावनेने पहावे.
माणिकराव विधाते यांनी पॅन कार्ड धारकांचे प्रश्न पक्षाच्या माध्यमातून सोडवण्याचे प्रयत्न केले जातील. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार  मोठ्या मताधिक्क्याने निवडून देऊन आपला खासदार संसदेत पाठवण्यासाठी सर्वांनी एकजूट ठेवली पाहिजे. या सरकारने बेरोजगारांची मोठी फसवणूक केली आहे. त्याचे उत्तर देण्याची हीच वेळ असल्याचे सांगत पाठिंब्याबद्दल पॅन कार्ड क्लब बाधितांचे आभार मानले. 
कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दारवटकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने गुंतवणूकदार उपस्थित होते.

कलारंग ड्रॉईंग अ‍ॅकॅडमीच्यावतीने 26 पासून रांगोळी शिबिर


नगर । प्रतिनिधी -
येथील कलारंग ड्रॉईंग अ‍ॅकॅडमीच्या वतीने दि. 26, 27 व 28 एप्रिल रोजी तीनदिवसीय पोट्रेट रांगोळी आणि थ्रिडी रांगोळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर कमलाबाई नवले हॉल, गुलमोहोर रोड, आम्रपाली मंगल कार्यालयाशेजारी, सावेडी, अहमदनगर येथे  सकाळी 9 ते 4 यावेळेत होणार आहे.
आपल्या अंगात कला-गुण असतात, मात्र ते बाहेर पडत नाही. मात्र माणूस चित्र अथवा रांगोळी काढण्यासाठी नेहमीच घाबरत असतो. कारण जर चित्र अथवा रांगोळी चुकली तर लोक आपल्यावर हसतील असा न्यूनगंड मनात असतो. त्यामुळे माणूस नेहमीच या दोन गोष्टींपासून दूर राहणे पसंत करतो. या शिबिरामध्ये आत्मविश्वास देण्याचे काम आणि त्याच्या हातून चांगले चित्र व रांगोळी काढण्याचे काम केले जाणार आहे.
तरी चित्र व रांगोळी काढण्याची आवड असणार्‍या कोणत्याही वयोगटातील इच्छुकांनी या शिबिरात भाग घ्यावा, असे आवाहन शिबिराच्या संयोजिका सुजता औटी-पायमोडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मो.9850177042 या क्रमांकावर संपर्क साधावा.

दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी लायन्स क्लब प्रयत्नशील ः राजश्री मांढरे


नगर । प्रतिनिधी -
आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी लायन्स क्लब प्रयत्नशील आहे. लायन्स मिडटाऊनने सतत वंचित घटकातील विद्यार्थी केंद्रबिंदू मानून आपले सामाजिक कार्य चालू ठेवले असून, मदतीच्या हातासह विद्यार्थ्यांना प्रेमाने प्रोत्साहन दिले जात आहे. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असून, भविष्यातील सक्षम भारत त्यांच्या माध्यमातून घडणार असल्याची भावना लायन्स मिडटाऊनच्या अध्यक्षा राजश्री मांढरे यांनी व्ंयक्त केली.
लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या वतीने श्रीगोंदा तालुक्यातील बाबा आमटे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना नित्योपयोगी वस्तू, शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मांढरे बोलत होत्या. यावेळी अ‍ॅड.सुनंदा तांबे, प्रकल्प प्रमुख लतिका पवार, प्रा.शोभा भालसिंग, सविता जोशी, अमल ससे आदिंसह लायन्सचे पदाधिकारी उपस्थित होते.
 लायन्स मिडटाऊनच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो. वंचितांच्या आनंदात मोठे समाधान मिळत असून, या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख लतिका पवार यांनी दिली. लायन्सच्या पदाधिकार्‍यांनी नित्योपयोगी वस्तू, शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले असता वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर समाधानाचे भाव व हास्य फुलले होते.

600 जणांना रोजगाराचे प्रशिक्षण देणार ः सिन्हा


नगर । प्रतिनिधी -
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांनी केलेल्या पाहणीवरून असे निदर्शनास आले आहे की ग्रामीण भागातील तरुण वर्ग नोकरी, व्यवसायानिमित्ताने शहरी भागाकडे स्थलांतरित होत आहे. त्यामुळे ग्रामीण भाग ओस पडत आहे. शहरी भागातही नोकरी व्यवसाय न मिळाल्याने बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याच दृष्टीने सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने 2019-20 या काळामध्ये नगर जिल्ह्यात 24 प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येणार असून, त्या अंतर्गत 600 प्रशिक्षणार्थींना रोजगार उपलब्धतेसाठीचे प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याची माहिती सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक प्रदीपकुमार सिन्हा यांनी दिली.
ग्रामीण बेरोजगार तरुण वर्गाला दारिद्र्यरेषेचे कार्डधारकांना त्यांच्या अवगत असलेल्या कलागुणांना शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षित करून ग्रामीण भागामध्ये व्यवसाय करण्यासाठी शासकीय यंत्रणा आणि बँकेच्या माध्यमातून कर्जरूपी अर्थसाह्य व अनुदान मिळून देण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या सूचनेनुसार प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण (आरएसईटीआय)ला जिल्ह्याच्या अग्रणी बँकेने स्थापन केलेले आहेत.
त्यानुसार सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या सहयोगाने व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा उद्योग केंद्र नाबार्ड यांनी संचलित अहमदनगर येथे ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था स्थापना 2011 मध्ये करण्यात आली आहे. तेव्हापासून विविध व्यवसायाचे प्रशिक्षण आयोजन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यामध्ये भाग घेतलेल्या प्रशिक्षणार्थींपैकी 80% प्रशिक्षणार्थी यांना शासकीय योजनेचे अनुदान व बँकेकडून कर्जरूपी अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
तरुण वर्गामध्ये स्वयंरोजगारासंबंधी जागृती निर्माण करून त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. संस्थेमार्फत अहमदनगर अथवा तालुका या ठिकाणी मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असून, प्रशिक्षणार्थींना दुपारचे जेवण व प्रशिक्षणाचा खर्च संस्थेमार्फत दिला जाईल. सदर प्रशिक्षण 6 ते 30 दिवसाचे असणार असून, यामध्ये शेती, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी मेंढीपालन, ड्रेस डिझायनिंग महिला-पुरुष, मसाला पदार्थ निर्मिती, मेणबत्ती, अगरबत्ती निर्मिती, बेकरी आदींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Thursday, 18 April 2019

जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर


नगर । प्रतिनिधी -
जिल्ह्यात 23 एप्रिल रोजी  37-अहमदनगर व दिनांक 29 एप्रिल रोजी 38-शिर्डी (अ.जा)  लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने या दिवशी असणारे आठवडे बाजार भरविण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच जत्रा पुढे ढकलण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना मार्केट अ‍ॅन्ड  पेअर अ‍ॅक्ट 1862 चे कलम 7 (अ) अन्वये प्राप्त  झालेल्या अधिकाराचा वापर करुन हा आदेश दिला आहे. जिल्ह्यातील सीमेच्या हद्दीत दिनांक 23 एप्रिल अहमदनगर व दिनांक 29 एप्रिल शिर्डी ( अ.जा) लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. या मतदानाच्या दिवशी असणारे आठवडे बाजार भरविण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच दिनांक 23 व 29 एप्रिल रोजी मतदानाच्या  दिवशी असणार्‍या जत्रा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 प्रक्रिया सुरु झाली असून  मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील तालुक्यांत व गावात भरणारे आठवडे बाजार, तसेच जत्रा यामुळे मतदान कामामध्ये कोणताही व्यत्यय येवू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने मतदानाचे दिवशी  आठवडे बाजार बंद ठेवणे अथवा पुढे ढकलणे आवश्यक असल्याने मार्केट अ‍ॅन्ड फेअर अ‍ॅक्ट 1862  चेक कलम 5 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार दिनांक 23 एप्रिल रोजी 37- अहमदनगर लोकसभा मतदार संघातील नगर तालुक्यातील आठवडे बाजार नगर शहर, पोखर्डी, खोसपुरी, खंडाळा व जत्रा आठवड, शिराढोण व नेवासा तालुक्यातील आठवडे बाजार माळीचिंचोरा, भेंडा बु., माका, सलाबतपूर, उपविभागीय दंडाधिकारी श्रीगोंदा- पारनेर भाग- श्रीगोंदा तालुक्यातील आठवडे बाजार मांडवगण, चिंभळे, देव दैठण, अजनूज व जत्रा पारगाव सुद्रीक व  पारनेर तालुक्यातील आठवडे बाजार टाकळी ढोकश्वर, निघोज, देठणे गुंजाळ, उपविभागीय दंडाधिकारी कर्जत भाग - कर्जत तालुक्यातील आठवडे बाजार- राखीन व जामखेड तालुक्यातील आठवडे बाजार पिंपरखेड, जातेगाव व जत्रा फक्राबाद, धानोरा, बंजारवाडी.
उपविभागीय दंडाधिकारी पाथर्डी भाग - पाथर्डी  तालुक्यातील आठवडे बाजार करंजी व शेवगाव तालुक्यातील आठवडे बाजार खानापूर, आव्हाणे बु. व जत्रा प्रभुवडगाव. उपविभागीय दंडाधिकारी श्रीरामपूर भाग -  राहुरी तालुक्यातील आठवडे बाजार  म्हैसगाव, ब्राम्हणी , गुहा, सात्रळ व जत्रा राहुरी बु.
तसेच दिनांक 29 एप्रिल रोजी 38- शिर्डी (अ.जा) लोकसभा मतदार संघ-उपविभागीय दंडाधिकारी श्रीरामपूर भाग - श्रीरामपूर तालुक्यातील आठवडे बाजार मालुंजा, टाकळीभान, भोकर व जत्रा फत्त्याबाद,  उपविभागीय दंडाधिकारी संगमनेर भाग - संगमनेर तालुक्यात आठवडे बाजार आश्वी बु. व जत्रा शेडगाव, पिंपरणे व अकोले तालुक्यात आठवडे बाजार राजूर, वीरगाव, केळी रुम्हणवाडी.
उपविभागीय दंडाधिकारी शिर्डी भाग राहाता तालुक्यातील आठवडे बाजार पिंप्रीनिर्मळ, पुणतांबा व कोपरगाव तालुक्यातील आठवडे बाजार - कोपरगाव नगरपरिषद हद्द (शहर) वरील दोन्ही लोकसभा मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद राहणार आहेत व जत्रा पुढे ढकलण्यात आले आहेत असेही   प्रशासनाकडून प्रसिध्दीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

शहरातील तिन्ही बसस्थानकांवर मतदार सहाय्यता कक्ष


नगर । प्रतिनिधी -
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या निर्देशानुसार अहमदनगर-शिर्डी लोकसभा मतदारसंघात  निवडणूक विषयक मतदार जनजागृती व्हावी व मतदानाची टक्केवारी वाढावी या निमित्ताने नगर शहरातील बसस्थानक क्रमांक एक, दोन व तीनवर मतदार सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
मतदार माहिती फलक, मतदार सेल्फी पॉइंट, त्याबरोबरच मतदान यादीमध्ये आपले नाव पाहण्यासाठी व मतदान केंद्राच्या अन्य माहितीसाठी 1950, एनव्हीएसपीडॉट इन, वॉटर हेल्पलाइन सुविधा, पीडब्ल्यूडी, मतदान केंद्रांची रचना इत्यादी निवडणूक व मतदान विषयक माहिती दर्शविणारे फलक मतदार सहायता कक्षात लावण्यात आले आहेत. तीन दिवसांमध्ये सुमारे दहा हजारपेक्षा जास्त नागरिकांनी या मतदार सहायता कक्षाला भेट देऊन आपल्या मतदान केंद्राची माहिती जाणून घेण्याबरोबरच मतदार जनजागृती प्रबोधनाची देखील माहिती घेतली.
लोकांनी सेल्फी पॉइंटवर सेल्फी काढून मतदार जनजागृती स्पर्धेमध्ये सहभाग देखील घेतला. त्याचबरोबर मतदारांकडून संकल्पपत्र देखील भरून घेण्यात आली. भारत निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग व जिल्हा निवडणूक शाखा अहमदनगर यांच्या माध्यमातून स्वीप मतदार जनजागृती मोहिमेअंतर्गत विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मतदार सहायता कक्षाच्या उपक्रमासाठी  बसस्थानक आगार प्रमुख रामदास व्यवहारे,  शिवाजी कांबळे यांनी मोलाचे सहकार्य केले. उपक्रमासाठी कॅम्पस अँम्बेसिडर राहुल पाटोळे, संदीप कुसळकर, डॉ.सौ.चोपडे यांनी सहकार्य केले. या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार निवडणूक हेमा बडे, स्वीप नोडल ऑफिसर तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम, शिक्षणाधिकारी प्राथमिक रमाकांत काटमोरे, शिक्षणाधिकारी माध्यमिक लक्ष्मण पोले, मतदारदूत डॉ. अमोल बागुल यांनी मार्गदर्शन केले आहे.

फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने ‘शंभर टक्के मतदान घडवा, लाख रुपये बक्षीस मिळवा’ स्पर्धा


नगर । प्रतिनिधी -
लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रियेत सर्व नागरिकांचा सहभाग आवश्यक असून, गावा-गावात शंभर टक्के मतदान होण्यासाठी फिनिक्स सोशल फाऊंडेशनने मतदार जागृती उपक्रमांतर्गत शंभर टक्के मतदान घडवा, लाख रुपये बक्षीस मिळवा स्पर्धा जाहीर केल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी दिली.
लोकशाहीत मतदानाला महत्त्व असून, कमी मतदान झाल्याने योग्य उमेदवार निवडला जात नाही. कमी मतदान हे लोकशाहीला मारक असून, शंभर टक्के मतदान घडवून आणण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून गावपातळीवर जागृती चालू आहे. नुकतेच नागरदेवळे (ता.नगर) येथील ग्रामस्थांनी शंभर टक्के मतदान घडवून आनण्याचा संकल्प केला आहे.  मतदानासारख्या राष्ट्रीय मोहिमेत सहभागी होणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सोशल मीडियाचा वापर युवकांनी मतदार जागृतीसाठी करुन शंभर टक्के मतदान घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावेत. ज्या गावात शंभर टक्के मतदान होणार त्या गावाच्या ग्रामपंचायतीस 1 लाख 11 हजार 111 रु. बक्षिस फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते देऊन गौरव केला जाणार असल्याचे बोरुडे यांनी सांगितले.

भगवान महावीरांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला ः डॉ. शहा


नगर । प्रतिनिधी -
भगवान महावीरांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी जमीन खोदू नका, वृक्ष तोडू नका असा संदेश दिला. वनस्पती देखील सजीव आहेत हे भगवान महावीरांनी अडीच हजार वर्षांपूर्वी सांगितले होते,असे प्रतिपादन द जैन फिलॉसॉफिकल सोसायटीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जी. बी. शहा यांनी केले.
संपूर्ण जगाला शांतता व अहिंसेचा संदेश देणारे 24 वे जैन तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त कडा येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित इतिहास विभाग, गांधी महाविद्यालय व श्री वर्धमान स्थानक वासी जैन श्रावक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मंडळाचे अध्यक्ष कांतीलाल चानोदिया, सचिव हेमंत पोखरणा, कार्याध्यक्ष योगेश भंडारी, पोपटकाका भंडारी, प्राचार्य डॉ. नंदकुमार राठी, इतिहास विभागाचे प्रा. डॉ. राधाकृष्ण जोशी,  प्रा. नवनाथ विधाते, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष रतीलालजी कटारिया, डॉ.प्रमोद भळगट, डॉ.महेंद्र पटवा, संजय मेहेर, बाबूलाल भंडारी, सरपंच अनिल ढोबळे, शंकरराव देशमुख, डॉ.अनिल गर्जे, डॉ.योगेश रसाळ, डॉ. युनूस सय्यद, डॉ. जमीर सय्यद, प्रा.शिवराज पातळे, प्रा.किशोर चौधरी, शोभचंद ललवाणी आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी डॉ. शहा म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीत जैन समाजाने भगवान महावीरांच्या अहिंसेचे पालन करीत स्वातंत्र्यसंग्रामात मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता. आझाद हिंद सेनेत नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे एक खाजगी डॉक्टर खंडेलवाल हे भगवान महावीरांचे अनुयायी होते. कुमारी रमा जैन आणि तिची बहीण देखील आझाद हिंद सेनेत होत्या. तसेच सम्राट खारवेल याच्या शिलालेखावरून आपल्या देशाला भारतवर्ष हे नाव मान्य करण्यात आले असेही त्यांनी सांगितले.
सकाळी 8 वाजता जैन समाज बंधू-भगिनींनी भव्य मिरवणूक काढली होती. व्याख्यानापूर्वी नवकार महिला स्वयंसहायता गटाच्या महिला व पाठशाळेच्या विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यावेळी रक्तदान शिबिर देखील घेण्यात आले. प्रारंभी प्राचार्य नंदकुमार राठी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. राधाकृष्ण जोशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शांतीलाल शिंगवी यांनी सूत्रसंचालन केले. रतीलालजी कटारिया यांनी आभार मानले. या कार्यक्रमास परिसरातील जैन समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगर दक्षिणमध्ये निवडणुकीची रणधुमाळी जोमात


नगर । प्रतिनिधी -
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून  19 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. त्यांनी  निवडणुकीचा प्रचार जोमात सुरु केल्याने गल्लो गल्ली व वाड्या वस्त्यावर नेत्यांच्या गाड्यांचा धुराळा उडण्यास सुरवात झाली आहे. विविध पक्षांच्या  अनेक दिग्गजांच्या सभा थेट तालुकास्तरावर होत असल्याने या निवडणुकीची रंगत अधिकच वाढत चालली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.
नगर लोकसभा मतदारसंघात 16 पेक्षा जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने आता निवडणूक विभागाची जबाबदारी वाढली आहे. एका मतदान यंत्रावर केवळ 15 उमेदवार आणि एक नोटा अशा 16 चिन्हांसाठी जागा असल्याने आता नगर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर दोन मतदान यंत्रे ठेवावी लागणार आहेत.
सध्या प्रचार वैयक्तीक पातळीवर येवून ठेपला आहे. दुष्काळामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या विशेषतः बळीराजाच्या हाताला काम नसल्याने तेही प्रचाराच्या रणधुमाळीत सामिल झालेले दिसत आहेत. ग्रामीण भागात आयोजित केल्या जाणार्‍या जाहीर सभांना असणारी उपस्थिती हे त्याचे द्योतक आहे. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता प्रचार जोमात सुरु आहे. भर उन्हात प्रचाराने वातावरण तापू लागले आहे. एकमेकांची उणीदुणी काढण्यासोबतच शेवटच्या टप्प्यातील राजकीय खेळी खेळण्यास सुरवात झाली आहे. नात्यागोत्याच्या राजकारणाने नगर दक्षिण व नगर उत्तर लोकसभा मतदारसंघात नेहमीच ठसा उमटविला आहे.  या निवडणुकीत दोन्हीही मतदार संघांत पक्षापेक्षा उमेदवाराचे नात्यागोत्याचे संबंध प्रभावी ठरणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राजकारणातील मुरब्बी नेतेही जातीपातीचे व नात्यागोत्याचे राजकारण करण्यावर लक्ष केेंद्रीत करु लागल्याने राजकीय अंदाज बांधणे कठीण झाले आहे. आता तर बड्या नेत्यांनी नात्यागोत्याच्या राजकारणात नवीन चेहरे आणून नवीन नवीन क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. आता कोण कोणाचा प्रचार करेल, हे सांगणे कठीण झाले आहे. मतदानासाठी आता अवघे 5 दिवस उरले असल्याने राजकीय खेळ्यांना ऊत आला असून कोण कोणाला तारणार आणि कोण कोलदांडा घालणार हे लवकरच समोर येणार आहे.

Wednesday, 17 April 2019

सुख सामाजिक बंधच्या ‘साहस’ पुरस्कारांचे वितरण


नगर । प्रतिनिधी -
आज समाजामध्ये नकारात्मकता पसरत आहे. सोशल मीडियाचा वापर हा समाजासाठी घातक होत आहे. एखादी चांगली-वाईट घटना नकारात्मक किंवा विरोधात्मकरित्या तयार करुन ती जाणीवपूर्वक पसरविली जाते आणि त्या घटनेची सत्यता पडताळून न पाहता प्रत्येकजण दुसर्‍यांना पाठवतो. त्यामुळे समाजामध्ये नकारात्मकता वाढत आहे. यासाठी सोशल मीडियाचा वापर मर्यादीत होऊन सुसंस्कृत लोकांनी यावर उपाय करणे गरजेचे आहे.  सुख सामाजिक बंध या संस्थेच्यावतीने समाजातील प्रतिष्ठितांना पुरस्कार देऊन समाजात सकारात्मकता वाढवण्यासाठी होणारा प्रयत्न कौतुकास्पद आहे. असे उपक्रम पुन्हा पुन्हा आयोजित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन स्नेहालयाचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले.
येथील सुख सामाजिक बंध संस्थेच्यावतीने विविध  क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचा ‘साहस’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात डॉ. कुलकर्णी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार सुधीर लंके होते. यावेळी  मनगाव प्रकल्पाचे प्रणेते डॉ.राजेंद्र धामणे, सौ.डॉ. सुचेता धामणे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक गणेश भोसले, आदर्शगांव कासारेचे सरपंच धोंडीभाऊ दातीर, संस्थेचे  मार्गदर्शक सुखदेव शेडाळे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सुखदेव शेडाळे म्हणाले, युवकांमध्ये असलेले नैराश्य दूर करण्यासाठी संघर्षमय प्रवास असणार्‍या व्यक्तींचा सन्मान केला आहे. त्यामुळे युवकांमध्ये सकारात्मक भावना  वृद्धींगत होण्यासाठी मदत होऊ शकेस. शून्यातून विश्व निर्माण करणारे, जीवनात संघर्ष, सचोटी, प्रामाणिकपणा, जीवनात खडतर व अपार मेहनत घेऊन ताठ मानेने जगण्याचा नवीन मार्ग शोधणार्‍या या व्यक्ती आहेत.  दुसर्‍याच्याही जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी रोजगार मिळवून देऊन त्यांनाही आनंदी करणार्‍या 11 रत्नांचा ‘साहस’ पुरस्काराने सन्मान संस्थेच्यावतीने करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
‘साहस’ पुरस्कारार्थींमध्ये अण्णासाहेब म्हस्के- संस्थापक स्वर्णमाला पतसंस्था, संतोष हरबा- कलाकार, विष्णूशेठ मेंघानी- उद्योजक, हभप तुळशीराम महाराज लबडे, भास्करराव महांडूळे- उद्योजक, बाळासाहेब उबाळे- व्यावसायिक, जितेंद्र गांधी- व्यावसायिक, शुभम राऊत - तबलावादक, मनीष झंवर- प्रिटींग व्यवसाय, जगन्नाथ बोरुडे - बांधकाम व्यावसायिक, रोहिदास कोकणे- श्रमिक उद्योग समूह यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ.राजेंद्र धामणे, भगवान फुलसौंदर, गणेश भोसले यांनीही आपले मनोगत व्यक्त करतांना सुख सामाजिक बंध या संस्थेने सहासी धाडसी, व्यक्तींच्या कार्याची नोंद घेऊन समाजात नव्या दमाने, नव्या जोमाने काम करण्यासाठी पाठीवर थाप दिली व पुन्हा एकदा नवचेतना दिली, अशा भावना व्यक्त केल्या.
प्रास्ताविक पारूनाथ ढोकळे यांनी केले तर सूत्रसंचालन  दिलीपराव गलांडे यांनी केले. प्रा.तुकाराम अम्रीत यांनी आभारमानले.

बालगोपालांसाठी मोफत हसत खेळत राजयोगा मेडिटेशन शिबिर ः डॉ. कांकरिया


नगर । प्रतिनिधी -
येथील आनंदऋषिजी मेडिटेशन सेंटरमध्ये यंदाच्या सुट्टीत खास बालगोपालांसाठी मोफत हसत खेळत राजयोगा मेडिटेशन शिबिराचे आयोजन केले आहे, अशी माहिती संचालिका डॉ. सुधा कांकरिया यांनी दिली.
 सध्याच्या जगात मुलांवर अभ्यासाच्या ओझ्याबरोबरच वाढत्या टी. व्ही., कॉम्प्युटर, मोबाईलच्या अति वापरामुळे अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे बहुतांश मुलांच्या स्वभावात चंचलता वाढत चालली आहे. तसेच विभक्त कुटुंब पध्दतीमुळे मुलांचे भावनिक जग विखुरले जात आहे. सुसंस्काराचा अभाव जाणवत आहे. यावर उपाय म्हणजे पालकांनी मुलांसाठी प्रेमळ वेळ देणे व त्यासोबतच मुलांनी राजयोगा मेडिटेशन करणे हे होय. राजयोगा मेडिटेशनमुळे मुलांची चंचलता कमी होईल, एकाग्रता, शांतता व स्मरणशक्तीत वाढ होईल तसेच निरोगी आरोग्य निर्माण होण्यास मदत होईल. सदर शिबिर वयोगट 5 ते 15 वर्षांसाठी आहे. तसेच 10 वर्षाखालील मुलांच्या सोबत पालकांनी येणे आवश्यक आहे. सदर कोर्स हा आनंदऋषीजी मेडिटेशन सेंटर, ब्लड बँकेच्या बेसमेंटला, अहमदनगर येथे दिनांक 22 एप्रिलपासून 5 दिवस रोज सकाळी 10 ते 11.30 या वेळेत होईल.
नावनोंदणीसाठी प्रिया दिदी 9850887838, दत्तात्रय वाडकर 9766494901 यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहनही डॉ. कांकरिया यांनी केले आहे.

भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भगवान महावीरांना अभिवादन


नगर । प्रतिनिधी -
भिंगार येथे बुधवारी भगवान महावीर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत करुन भगवान महावीर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, अतुल भंडारी, आनंद बोथरा, आनंद गांधी, प्रवीण फिरोदिया, सत्यम लुणिया, मयुर भंडारी, शुभम गांधी, प्रज्योत लुणीया आदींसह समाजबांधव उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, भगवान महावीर यांनी जगाला सत्य व अहिंसेचे तत्व दिले.

भगवान महावीर जयंतीनिमित्त नगरमध्ये शोभायात्रा ‘त्रिशला नंदन वीर की,जय बोलो महावीर की’च्या जयघोषाने शहर निनादले


नगर । प्रतिनिधी -
अहिंसा परमो धर्म: या  मंत्राचा उपदेश देत संपूर्ण मानवजातीला दिशा देणार्‍या भगवान महावीर  स्वामींची 2618 वी जयंती (जन्मकल्याणक) बुधवारी नगरमध्ये विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.  सकाळी सकल जैन समाजातर्फे शहरात शोभायात्रा काढण्यात आली. चौक सजावट, रांगोळी स्पर्धाही घेण्यात आली. शोभायात्रेनंतर आनंदधामच्या प्रांगणात साधूसाध्वीजींनी भगवान महावीर स्वामींच्या जीवन चरित्रावर प्रवचन दिले.
सकाळी 7.30 वाजता कापड बाजार जैन मंदिरापासून  शोभायात्रेला प्रारंभ झाला. या शोभायात्रेत सनई, नगारा, चौघडा, बॅण्ड पथक, घोडेस्वार, उंटस्वार, डोक्यावर मंगल कलश घेतलेल्या मुली, विविध वेशभूषा परिधान केलेले लहान मुले, मुली, पांढरे वस्त्र परिधान केलेले पुरुष, केसरी, पिवळ्या, लाल साड्या परिधान केलेल्या महिला  सहभागी झाल्या होत्या. भगवान महावीर स्वामींची प्रतिमा असलेले वाहन, रथ व शेवटी अनुकंपा (प्रसाद)ची गाडीही होती.
या शोभायात्रेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, शिवसेना उपनेते अनिल राठोड, आ.संग्राम जगताप, कापडबाजार जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा, आनंदराम मुनोत, संतोष बोथरा, महावीर बडजाते, डॉ.प्रकाश कांकरिया, चंपालाल मुथा, संतोष गांधी, अशोक (बाबूशेठ) बोरा आदी सहभागी झाले होते.
ही शोभायात्रा कापडबाजार, अर्बन बँक चौक, घुमरे गल्ली, गुजर गल्ली, आदेश्वर जैन मंदिर, लक्ष्मी कारंजा, चितळे रोड, नेता सुभाष चौक, नवीपेठ जैन स्थानक, घासगल्ली, महात्मा गांधी रोड, तेलीखुंट चौक, दाळमंडई, आडतेबाजार, गंजबाजार, सराफबाजार, जुना कापडबाजार, खिस्तगल्ली, बुरूडगल्ली, जुनी वसंत टॉकीज, सहकार सभागृहमार्गे धार्मिक परीक्षा बोर्ड आनंदधाम येथे पोहचली. शोभायात्रा मार्गावर विविध मंडळे, जैन भाविकांनी आकर्षक चौक सजावट केली होती. आनंद संस्कार शिक्षा अभियानच्या विद्यार्थ्यांनी  लेझीमचे  सादरीकरण  केले. सिमंधर स्वामी भक्ती मंडळाने टिपरी नृत्य सादर केले. रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. त्रिशलानंदन वीर की, जय बोलो महावीर की अशा घोषणा देण्यात आल्या. चौकाचौकात भाविकांना पिण्याचे पाणी, प्रसादाचे वाटप करण्यात आले. महावीर इंटरनॅशनल युवा केंद्राच्यावतीने  मार्केटयार्डसमोर शीतपेयाचे वापट करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश बाफना, झोन चेअरमन गौतमलाल बरमेचा, सेके्रटरी सुवालाल ललवाणी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आनंदधाम येथे महाराष्ट्र प्रवर्तक  कुंदनऋषीजी महाराज, प्रखर वक्ता तरूणसागरजी महाराज यांचे गुरु आचार्य पुष्पदंत सागरजी महाराज, प्रबुध्द विचारक आदर्शऋषीजी महाराज, पद्मऋषीजी महाराज, अलोकऋषीजी महाराज,   विमलकंवरजी महाराज, किरणप्रभाजी महाराज, पुष्पकुंवरजी महाराज, डॉ.प्रियदर्शनाजी महाराज, सत्यप्रभाजी  महाराज, दिव्यदर्शनाजी  महाराज, सम्यकदर्शनाजी महाराज, विश्वदर्शनाजी महाराज,  अर्चनाजी महाराज आदी साधूसाध्वीजींच्या उपस्थितीत प्रवचन तथा गुणगाण झाले.
यावेळी नेहा ओस्तवाल, समृध्दी शेटिया, दिया मुथा, निहारिका बडजाते या मुलींनी भक्तीगीते तसेच कविता सादर केल्या. जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांनी स्वागत केले. श्रावक संघाचे सेक्रेटरी संतोष बोथरा, कापड बाजार जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा, महावीर बडजाते, संतोष गांधी, सविता फिरोदिया आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी महाराज म्हणाले, भगवान महावीर यांच्या जन्माला जन्मकल्याणक म्हटले जाते. जन्मकल्याणक हे आत्म्याला अंधारातून प्रकाशाकडे घेवून जाणारे असते. राजभवनाबाहेर पडत त्यांनी साडेबारा वर्षांची कठोर साधना केली. यातून ते केवलज्ञानी झाले. आपल्याला प्राप्त झालेल्या आत्मज्ञानाचा उपयोग त्यांनी समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी केला. अहिंसा, सत्य आणि अपरिग्रहाचा विचार त्यांनी कायम मांडला. जो आजच्या काळातही तितकाच महत्त्वपूर्ण आहे.
आदर्शऋषीजी महाराज म्हणाले, जो रात्री प्रकाश देतो त्याला दिवा म्हणतात, जो दिवसा प्रकाश देते त्याला सूर्य म्हणतात. मात्र जे हजारो वर्षांपासून समस्त मानवजातीला विचारांचा प्रकाश देत आहेत, त्यांना भगवान महावीर म्हणतात. आज 2600 वर्षानंतरही महावीर स्वामींचे विचार मानवजातीला तारणारे आहेत. यातूनच त्यांची महानता कळून येते.
आचार्य पुष्पदंत सागरजी महाराज म्हणाले, दुसर्‍यांना योग्य मार्ग दाखवून देत त्यांना तारणारे तीर्थंकर असतात. भगवान महावीर स्वामींनी सर्वांना सत्य, अहिंसा, ब्रम्हचर्य, अपरिग्रह आणि क्षमा या पाच व्रतांचे पालन करण्याचा संदेश दिला. त्यांनी बारा वर्षाच्या तपस्यासाधनेत फक्त एक वर्ष आहार घेतला. बाकी अकरा वर्षे उपवास केला. त्याचबरोबर साधू, साध्वी, श्रावक आणि श्राविका या चार तीर्थांची स्थापना केली. यामुळे त्यांना तीर्थंकर म्हटले जाते. आजचे जग व्यावहारिक झाले आहे. अशांतता, भौतिकवाद वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर  भगवान महावीरांनी दाखवलेल्या  मार्गावर चालणे  प्रत्येक मनुष्याचे ध्येय व कर्तव्य आहे. आज त्यांचा जयंती सोहळा साजरा करताना आपण मनापासून येथे आहोत का याचे आत्मचिंतन करा, असे आवाहन आचार्य पुष्पदंत सागरजी यांनी केले.
रांगोळी स्पर्धेचा निकाल असा - प्रथम क्रमांक (विभागून)- मिनल पारख, राखी गांधी, प्रिती पोखरणा आणि तपस्या व साक्षी कांकरिया, व्दितीय क्रमांक (विभागून)- पूजा चंगेडिया आणि प्रेक्षा व दर्शना नहार, तृतीय क्रमांक (विभागून)- सोनाली बोरा आणि अखिल भंडारी. उत्तेजनार्थ- शामली व प्रतीक्षा गुगळे, नयना व प्रिया गांधी, स्वीटी व तृप्ती मुथा. लहान मुलांसाठी विशेष पुरस्कार- मीत व मन चंगेडिया. रांगोळी स्पर्धेचे परीक्षण सरोज कटारिया व शैला गांधी यांनी केले.  बक्षीस वाचन सुभाष मुथा यांनी  केले.  शहरात बहुतेक ठिकाणी महावीर जयंतीनिमित्त चौकांची विशेष सजावट करण्यात आली होती.

Tuesday, 16 April 2019

शरद पवारांच्या प्रत्युत्तराकडे लक्ष


नगर । प्रतिनिधी  -
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज  (मंगळवार) सायंकाळी सहा वाजता मार्केट यार्डसमोरील मोकळ्या मैदानात सभा होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला ते काय प्रत्युत्तर देणार याकडे नगरवासीयांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. नगरमध्ये मागील आठवड्यात झालेल्या सभेतही त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर आज शरद पवार यांची नगरला सभा होत आहे. पवार यांची यापूर्वी या मतदारसंघातील शेवगाव येथे सभा झाली होती. त्यानंतर नगरची ही पहिलीच सभा असून, या सभेत ते मोदींच्या टीकेला काय प्रत्युत्तर देतात, याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, नगर दक्षिण मतदारसंघाची जागा शरद पवार यांनी प्रतिष्ठेची केली असून, स्वतः यात लक्ष घातले आहे. आपले राजकीय प्रतिस्पर्धी दिवंगत बाळासाहेब विखे यांचे नातू असलेल्या डॉ. सुजय विखे यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडण्यास पवारांनी नकार दर्शविला. तसेच त्यांच्या पक्षप्रवेशासही पद्धतशीर विरोध करून अखेर राष्ट्रवादीकडेच हा मतदारसंघ ठेवला. उमेदवार म्हणून इतर दोन-तीन नावांची चर्चा असताना ऐनवेळी आमदार संग्राम जगताप यांच्या नावाला पसंती दर्शवून पवारांनी विखेंविरोधात तोलामोलाचा तरुण उमेदवारही दिला. या पार्श्वभूमीवर नगरच्या लढतीकडे राज्यासह देशाचेही लक्ष लागलेले आहे.
शहरात मागील आठवड्यात झालेल्या सभेत पंतप्रधान मोदींनी पवार यांच्यावर सडकून टीका करून पक्षाच्या ‘राष्ट्रवादी’ या नावावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याला पवार नगरच्या सभेत चोख प्रत्युत्तर देतील, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे.

कै. शरदराव कटककर स्मृती ग्रंथालय व अभ्यासिकेचे उद्घाटन


नगर । प्रतिनिधी -
डॉ. हेडगेवार प्रतिष्ठान संचलित सरस्वती विद्या मंदिर, कसबे वस्ती, सावेडी येथे कै.शरदराव कटककर स्मृती ग्रंथालय व अभ्यासिकेचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक प्रा.श्री. नानासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ.श्री. हरिभाऊ देशमुख होते.
कै. शरदराव कटककर स्मृती ग्रंथालय व अभ्यासिकेचे उद्घाटन फीत सोडून केल्यानंतर शरदराव कटककर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी संघाचे शहर संघचालक श्री.शांतीभाई चंदे,  डॉ.हेडगेवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. दादाराम ढवाण, कोषाध्यक्ष श्री. अरूणराव धर्माधिकारी, सदस्य श्री. दत्तात्रेय जगताप, सरस्वती विद्या मंदिर शालेय समितीचे अध्यक्ष श्री. सतीश झिकरे, सर्वश्री. श्रीकृष्ण कटककर, श्रीराम कटककर, विश्वनाथ कटककर आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापक श्री. अविनाश साठे यांनी स्वागत केले. श्री. अरूणराव धर्माधिकारी यांनी प्रास्ताविक करताना 1997 साली सुरू झालेल्या सरस्वती विद्या मंदिरच्या प्रगतीचा आढावा घेत तीनमजली इमारत उभारण्याचा मानस व्यक्त केला. श्री.हेमंत धर्माधिकारी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्री. सतीश झिकरे यांच्या हस्ते प्रा.श्री. नानासाहेब जाधव, डॉ.श्री.हरिभाऊ देशमुख, श्री.शांतीभाई चंदे, श्री.दादाराम ढवाण व श्री. मानसिंग निंबाळकर यांना सन्मानित करण्यात आले. सौ.विमल जाधव यांच्या हस्ते सौ.शुभांगी सप्रे यांचा तर सौ.उषा धर्माधिकारी यांच्या हस्ते श्रीमती वर्षा कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. श्री. सुधाकर खर्डेकर यांनी ग्रंथालयासाठी पुस्तकांची भेट दिली.
उद्घाटक म्हणून बोलताना प्रा. नानासाहेब जाधव यांनी शरदराव कटककर यांच्या सहवासातील स्मृतींना उजाळा दिला. ते म्हणाले, 1966 मध्ये राहुरी येथे संघाचे शिबिर झाले होते. त्या शिबिरात शरदरावांची  पहिली भेट झाली. 1974 मध्ये संगमनेरला झालेल्या शिबिरात अधिक निकटचा सहवास लाभला. नगरमधून प्रकाश गटणे, पारनेरमधून गजानन पुरकर व बेलापूरमधून मी असे तिघेजण तेव्हा जिल्ह्यामधून प्रचारक म्हणून निघालो असताना बेलापूरला माझ्या निरोप समारंभासाठी शरदराव कटककर आले होते. शिबिराची रचना कशी असावी, शिबिरात कसे रहावे, संघ कार्याचा प्रचार व प्रसार कसा करावा, संघ स्वयंसेवकांना कसे जपावे व प्रोत्साहित कसे ठेवावे, याचा कृतीशील वस्तुपाठ शरदरावांनी आपल्या सर्वांसमोर ठेवला. संघाला अभिप्रेत असलेला या देशाचा विकास कसा झाला पाहिजे? हे शरदरावांसारखे तळमळीने कार्य करत असलेल्यांकडून कळते.
डॉ. देशमुख म्हणाले,  कर्जत व जामखेड तालुक्यात शरदराव कटककर यांनी केलेले संघकार्य भूषणावह आहे. संघाचा प्रचारक म्हणून त्यांनी केलेली कामगिरी बहुमोल आहे. त्यांनी कधीही कुणालाही दुखावले नाही.  श्रीमद् भगवतगीता व ज्ञानेश्वरी या ग्रंथांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. संस्कृतवर त्यांचे प्रभुत्व होते. सोशीकपणा, साधी राहणी ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष न देता ते संघाचा विचार आणि संघाचे कार्य जनसामान्यांपर्यत पोहोचवण्यात व्यस्त राहिले. हिंदु धर्म- हिंदु संस्कृतीचा अभिमान बाळगत नवीन पिढीवर त्यांनी ते संस्कार रूजवले. त्यांच्या संस्कारामधून उभा राहिलेला माझा मुलगा मुकुंदा हा पुढे विश्व हिंदू परिषदेचा महाराष्ट्र प्रांत संघटनमंत्री झाला. त्यांनी ग्रंथावर केलेले प्रेम लक्षात घेऊन त्यांच्या नावाने ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. हे ग्रंथालय विद्यार्थी, शिक्षक व जिज्ञासू वाचकांना संघकार्याची स्फूर्ती देत राहील.
लोकसभेच्या मतदानासाठी ऑस्ट्रेलिया-सिडनी येथून आलेल्या श्री. विजय सप्रे (मूळ रा.श्रीगोंदा) यांचा खास सत्कार करण्यात आला. श्री.श्रीराम कटककर यांनी मनोगत व्यक्त केले. श्री. रामभाऊ शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सर्वश्री. प्रा.व्यंकटेश होळेहुन्नुर, महेंद्रभाई चंदे, मिलिंद चवंडके, सोमनाथ दिघे, अजित पंडित, किरण जोशी, धनंजय देशमुख, कु. कविता विधाते, संगीता गायकवाड, प्राचार्य रवींद्र चोभे यांच्यासह शिक्षकवृंद व ग्रंथप्रेमी उपस्थित होते.

महावीर जयंतीनिमित्त बालगृह संस्थेला पुरणपोळीच्या जेवणासाठी किराणा भेट


नगर । प्रतिनिधी -
लहान मुले म्हणजे देवाघरची फुले अशी शिकवण आपल्या संस्कृतीने दिली आहेत. असे असले तरी आजही समाजात अनेक कारणांमुळे मुलांना वंचिताचे जगणे जगावे लागते. मायेची ऊब मिळवण्यासाठी सामाजिक संस्थांमार्फत चालवण्यात येणार्‍या वसतिगृहात, आश्रमात वास्तव्य करावे लागते. सण उत्सवानिमित्त त्यांना गोडधोड भोजनाचा आस्वाद देवून त्यांच्या चेहर्‍यावर हास्य फुललेले पाहणे खूप आनंददायी असते. भगवान महावीर स्वामीजी यांनीही आपल्या उपदेशातून नेहमीच मनुष्यरुपी ईश्वराची सेवा करण्याचा संदेश दिला. त्यामुळे महावीर जयंतीनिमित्त रिमांड होममधील मुलांना गोडधोड पुरणपोळीचे जेवण मिळावे यासाठी एकत्र येत किराणा साहित्याची मदत दिली. या कार्यातून मनाला खर्‍या अर्थाने समाधान लाभत आहे, असे प्रतिपादन जय आनंद महावीर युवक मंडळाचे सदस्य तथा नवीपेठ येथील रोहित कॉस्मेटिक्सचे संचालक शरद मुथा यांनी केले.
नवीपेठ जय आनंद महावीर युवक मंडळाचे सदस्य मनोज गुंदेचा, शरद मुथा, संतोष कासवा,योगेश मुनोत, कुंतीलाल राका, प्रमोद गांधी या सहा जणांनी एकत्र येत महावीर जयंतीनिमित्त नगरमधील मुला मुलींचे निरीक्षण गृह व बालगृह संस्थेतील मुलांना पुरणपोळीच्या स्वयंपाकासाठी किराणा दिला. महावीर जयंतीनिमित्त मुलांना गोड जेवण मिळावे यासाठी संस्थेला गहू, तांदूळ, चणा डाळ, तेल, गूळ, पापड असा किराणा देण्यात आला. संस्थेच्या अधीक्षिका पौर्णिमा माने, लिपिक आनंद देशमुख यांच्याकडे ही मदत सुपुर्द करण्यात आली.
संतोष कासवा म्हणाले की, सामाजिक जाणीवेतून आम्ही महावीर जयंतीनिमित्त हा उपक्रम राबविला. प्रत्येक जण सण उत्सव आपल्या परिवारासमवेत, मित्रांबरोबर साजरा करतो. स्वत:साठी काही तरी चांगले करणे ही मनुष्याची स्वाभाविक प्रवृत्ती असली तरी गरजू, वंचितांना देण्यातील आनंद काही औरच असतो. त्यामुळे संवेदनशील मनाने एक बांधिलकी म्हणून महावीर स्वामींची जयंती अशा मदतीतून साजरी केली आहे. बालगृहातील मुलांना अशा मदतीची मोठी गरज आहे. संस्थेला रोख मदतीसह वस्तुरुपानेही मदत करता येते. या संस्थेतील मुले, मुली शिक्षण घेतानाच स्वत:च्या पायावर उभे रहावेत यासाठी संस्थेतच लघुउद्योग उभारुनही एक मोठे कार्यही होवू शकते. आपले वाढदिवस, खास क्षण या मुलांसमवेत साजरे करून त्यांना अत्यावश्यक असलेल्या वस्तू, कपडे, शैक्षणिक साहित्य, खेळण्यांची भेटी देता येवू शकते. संस्थेला दिलेले जाणारे अर्थसहाय्य कलम 80 जी अन्वये करमुक्त आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी या संस्थेच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन कासवा यांनी केले.
पौर्णिमा माने म्हणाल्या, संस्थेत मुलांना सर्व सण उत्सवांचा आनंद मिळवून दिला जातो. सर्व कार्यक्रमही उत्साहात केले जातात. या कार्याला हातभार लावण्यासाठी संस्थेला मदत करून इच्छिणार्‍यांनी 0241- 234522, 2342949 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

तक्षीला स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केली पथनाट्याद्वारे जनजागृती


नगर । प्रतिनिधी -
तक्षीला स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन शहरात पथनाट्याच्या माध्यमातून पाणी बचतीसाठी प्रबोधन केले. तर मुलगी वाचवा... मुलगी शिकवाचा संदेश दिला. शाळेच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.
शहरातील माळीवाडा, जुने बसस्थानक, आनंदधाम आदी परिसरात या जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. त्याला उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
शहरासह जिल्ह्यात काही वर्षापासून पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. सतत दुष्काळी परिस्थिती उद्भत असल्याने  पाण्याच्या संकटाने गंभीर रूप धारण केले आहे. भविष्यातील जलसंकटापासून वाचण्यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी पाणी वाचविण्याचा संदेश दिला. शहरात अनेक ठिकाणी पाण्याचा अपव्यय होताना दिसत आहे. हा प्रश्न लक्षात घेऊन शाळेच्या प्राचार्या जयश्री मेहेत्रे यांनी दशकपूर्ती सोहळा जनजागृतीने साजरा करण्याचे ठरविले. तसेच महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून देखील स्त्री भ्रूण हत्येचे प्रकार उघडकीस येत आहेत. महिलांना समाजात व कुटुंबात देखील दुय्यम दर्जा दिला जातो. तर मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे प्रकार चालू आहेत. हे समाजातील प्रश्न प्रबोधनाने सोडविता येणार असल्याची भावना प्राचार्या मेहेत्रे यांनी व्यक्त केली.
शाळेत नवीन प्रवेश घेणार्‍या मुलींना मोफत शालेय पुस्तक संच, 10 वी व 12 वीमध्ये  प्रथम आलेल्या विद्यार्थिनीस अडीच हजार रु. तर विज्ञान, गणित व इंग्रजी या विषयात प्रथम येणार्‍या विद्यार्थिनीस दोन हजार शंभर रुपये रोख बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती शाळेच्या वतीने देण्यात आली. शाळेच्या प्राचार्या मेहेत्रे यांच्या संकल्पनेनुसार घेण्यात आलेल्या उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

नॅशनल गन हाऊस अहमदनगर संचलित एअर रायफल/एअर पिस्तोल शुटींग समरकॅम्प व शुटींग रेंजचे उद्घाटन


नगर । प्रतिनिधी -
नगर शहरामध्ये प्रथमच एअर रायफल/एअर पिस्तोल शुटींग रेंजचे उद्घाटन दि. 14 रोजी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, वरिष्ठ तुरुंगाधिकारी शेंगडे यांच्या हस्ते झाले.
उद्घाटनानंतर मान्यवरांनी स्वतः एअर रायफल/ एअर पिस्तोल शुटींगचा अनुभव घेतला. तसेच त्यांनी या शुटींग रेंजमुळे अनेक मुलांना स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळेल व शुटींग करीअरमध्ये नावलौकिक करण्याची संधी उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी शहरातील अनेक मान्यवरांनी भेट दिली. कार्यक्रमास प्रसाद कुलकर्णी, राजकमल कोहली, जयहिंद सैनिक सेवा फौंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, संजय पाटेकर, अश्पाक शेख, जगदीश चौधरी, सरिता कदम, ऑनररी लेफ्टनंट अशोक वाघ व इतर मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे संचालक/ कोच सागर वाबळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

महात्मा फुलेंच्या कार्यातून सामाजिक परिवर्तनाची सुरुवात झाली ः पडवळे


नगर । प्रतिनिधी -
मानवी मूल्यांवर आणि समानतेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्याचे कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले. सामाजिक परिवर्तनाची खरी सुरुवात फुलेंच्या कार्यातून दिसून येते. गुलामगिरी, अन्याय, अत्याचार, चुकीच्या रुढी, परंपरा, अशिक्षितपणा, शेतकर्‍यांच्या समस्या या सर्वांची चिकित्सा करून यातून सोडवणुकीसाठी फुले दाम्पत्याने अथक परिश्रम घेतले. म्हणूनच त्यांना जनतेने महात्मा ही पदवी दिली. त्यांच्या विचारातून आजच्या पिढीने बोध घेतला पाहिजे, असे प्रतिपादन शेंडीचे सरपंच बाबासाहेब पडवळे यांनी केले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शेंडी (ता. नगर) येथे डॉ. आंबेडकर फौंडेशन व शिवरुद्र बहुउद्देशीय संस्था आयोजित प्रबोधनपर व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी शिवरुद्रचे अध्यक्ष डॉ. भगवान चौरे, शासनाचा आदर्श युवा पुरस्कार विजेते अ‍ॅड. महेश शिंदे, ‘रयत’चे पोपटराव बनकर, छावाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, छावाच्या महिला जिल्हाध्यक्षा रजनीताई ताठे, दत्तात्रय जाधव, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश शिंदे, संदीप लोंढे, मनीष कुरुंद, दिगंबर शिंदे, शशिकांत पडवळे, सुमित शिंदे, अक्षय पडवळे, योगेश शिंदे, भैरव पडवळे, संजय शिंदे, अर्जुन सुसे, बबन शिंदे, संकेत सुसे, संतोष सुसे, चंद्रकांत सुसे, नितीन शिंदे आदी उपस्थित होते.
प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेमध्ये गायत्री मोरे, श्रावणी मालुसरे, अंकिता राऊत, ओंकार कासार, वैष्णवी शिंदे यांच्या भाषणाने उपस्थितांची मने जिंकली.
त्यानंतर शाहिर वसंत डंबाळे, शाहिर दिलीप शिंदे, शाहिर दादू साळवे, गायिका संगीता गायकवाड यांच्या शाहिरी जलसाने शेंडी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील युवक-युवती, महिला, ज्येष्ठ तल्लीन झाली.
यावेळी अ‍ॅड. महेश शिंदे यांनी, महात्मा फुले यांनी सर्व वंचित बहुजन व स्त्रिया यांच्या जीवनात बदल घडविला. युग परिवर्तन करून टाकणारी महान क्रांती केली. त्यांच्या महान क्रांतिकारी विचारांतून आज बदल झालेला आपल्याला दिसून येतो. स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांच्या कार्यातून आजच्या युवकांनी बोध घेऊन कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन व्याख्यानात केले.

केडगावमधील ओंकारनगर मनपा शाळेच्या शैक्षणिक मोबाईल अ‍ॅपचे उद्घाटन


नगर । प्रतिनिधी -
मनपाच्या केडगाव येथील महानगरपालिका ओंकारनगर शाळा एक दर्जेदार शिक्षण देणारी शाळा आहे. शाळेने आय. एस. ओ. मानांकन मिळवत अभिमानास्पद काम केले आहे. तंत्रज्ञानाच्या युगात स्वत:चे  शैक्षणिक अ‍ॅप तयार करत एक क्रांतिकारी पाउल टाकले आहे, असे प्रतिपादन मनपाचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी केले.
मनपाचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या हस्ते या मोबाईल अ‍ॅपचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रशासनाधिकारी जुबेर पठाण, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दादासाहेब नरवडे, विषयतज्ञ अरूण पालवे, मुख्याध्यापक भाउसाहेब कबाडी, सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका वृषाली गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सविता काळे,उपाध्यक्ष रवींद्र पानसरे, राजू देसाई आदी उपस्थित होते.
ओंकारनगर शाळेत विविध उपक्रम राबवत शाळेने शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. शाळेने स्वत:चे शैक्षणिक मोबाईल अ‍ॅप  तयार करत एक ऐतिहासिक क्षण निर्माण केला आहे, असे प्रशासनाधिकारी जुबेर पठाण  यांनी सांगितले.
तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना मोबाईलशी खेळता खेळता विविध ज्ञान मिळवता यावे, पालकांना विद्यार्थ्यांचा रोजचा गृहपाठ, संदेश, शालेय उपक्रम या मोबाईल अ‍ॅपव्दारे सहज पाहता येणार असल्याचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले.
यावेळी प्रवीण मुळे, सुनील सूर्यवंशी, शीतल शेंदुरकर, गणेश शेंदुरकर, संदीप शिंदे, छगन ठोकळ, शीतल उल्हारे, कोमल लोखंडे, मीरा जवणे, सविता लोखंडे, रवींद्र खोडके, हमजा खान आदी पालक उपस्थित होते.
विषयतज्ञ अरूण पालवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर दादासाहेब नरवडे यांनी आभार मानले.