Tuesday, 5 March 2019

उमेदवारीसाठी सुजय विखेंचे दबावतंत्र


नगर । प्रतिनिधी - विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे व सुजय विखे यांचा अद्याप भारतीय जनता पार्टीशी कोणताही संपर्क झालेला नाही. भाजपाचा कोणताही नेता यांच्या संपर्कात नाही. त्यांचे जे उमेदवारीसाठी चालले आहे ते फक्त दबावतंत्र आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सर्वच पक्षांवर ते उमेदवारीसाठी दबावतंत्र आणत आहेत. माझी त्यांची भेटही नाही. त्यामुळे विखे पिता-पुत्रांच्या भाजप पक्ष प्रवेशाच्या बातम्या फक्त राजकीय चर्चाच आहेत, अशी स्पष्टोक्ती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी आज नगरमध्ये केली.
भाजपाचे प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे सकाळी औरंगाबादहून पुण्यास जाताना भाजप शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी थांबले होते. यावेळी खासदार दिलीप गांधी, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी त्यांचे स्वागत केले. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व खासदार दिलीप गांधी यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुमारे तासभर सविस्तर चर्चा झाली. निवडणुकीची जोरदार तयारी करा अशी सूचना यावेळी खा.दानवे यांनी खा. गांधींना केली.
ते म्हणाले, लोकसभेसाठी भाजपाचा अद्याप कोणताही उमेदवार निश्चित नाही. राज्याची पार्लामेंट्री बोर्डाची पहिली बैठक सात तारखेला होणार होती, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौर्‍यामूळे ही बैठक आता अकरा तारखेला होणार आहे. या पहिल्या बैठकीत चर्चा होईल त्यानंतर पुन्हा पार्लामेंट्री बोर्डाची  दुसरी बैठक झाल्यानंतर केंद्राच्या पार्लामेंट्री बोर्डाकडे राज्यातील संभाव्य उमेदवारांची यादी  पाठवण्यात येईल. केंद्रीय पार्लामेंट्री बोर्डने मान्यता दिल्यानंतर उमेदवार जाहीर करण्याची भाजपची पद्धत आहे. त्यामुळे मी जरी राज्याध्यक्ष असलो तरी अद्याप माझी उमेदवारी जाहीर झालेली नाही. नगरमध्ये खासदार दिलीप गांधी यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. देशात फक्त आता नरेंद्र मोदीच सर्वांचे उमेदवार आहेत. पुन्हा त्यांच्याच नेतृत्वाखाली देशात भाजपची सत्ता येणार असल्याने  जालन्यातही मोदी व नगरमध्येही मोदी असेच वातावरण सर्वत्र आहे.

No comments:

Post a Comment